बस अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
मुंबई : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पहाटे खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर अपघाताबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली. ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होती. या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, घटनास्थळी मदतकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. खाजगी बसमध्ये मुंबईतील गोरेगाव येथील बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) असून पुण्यातील कार्यक्रम संपवून हे सर्वजण परत जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.