'या' जिल्ह्यात वादळ वा-यासह पावसाला सुरुवात
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे असून आज हलके गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यामध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोल्यात काही ठिकाणी गारपिटी झाली. वर्धा जिल्ह्यामध्येही गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
भारतीय हवामान खात्याकडून पुढचे २४ तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, गोवा आणि पुढे पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही भागांवर मेघगर्जनेच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पश्चिम विदर्भात गारपीटची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान आज अकोला शहरासह विविध भागात तुरळक पाऊस झाला. याशिवाय ३० ते ४० किमी. वेगाने वादळवारा वाहत आहे.
राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी अकराच्या सुमारास मालाडमधील मढ, मार्वे परिसरात पावसाने हजेरी लावली.