सावंतवाडी : देवगड-निपाणी-कलादगी रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण व मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान करण्यात येणार असल्यामुळे या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता मुदाळ तिठा आजरा – आंबोली – सावंतवाडी अशी वळविण्यात येणार आहेत. मात्र, आंबोली घाटातील ब्रिटीशकालीन कमानी व मोर्या कमकुवत झाल्यामुळे सदर रस्ता अवजड वाहतुकीस आधीच बंद केलेला आहे. या पार्श्वभूमीवर सदरची वाहतूक आंबोली घाटातून वळवल्यास सदरच्या कमानी खचून घाट रस्ता कायमस्वरूपी बंद होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत लोक प्रतिनिधींनी वेळीच आवाज उठवून ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
देवगड-निपाणी-कलादगी रस्ता रा.मा.क्र. १७८ वर कि.मी. ६६/० ते १३६ / ६०० या लांबीमध्ये हायब्रीड ॲन्युटी या योजनेअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करुन वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करुन हलक्या व लहान वाहनांकरीता बालिंगा-महेपाटी कोते- धामोड- शिरगाव-तारळे पडळी – कारीवडे – दाजीपूर – ओलवण प्रतिमा क्र. २९ चा वापर करावा. मुदाळतिट्टा मार्गे येणारी हलकी व लहान वाहने सरवडे-सोळांकूर- राधानगरी (स्वरुप लॉज जवळून) राधानगरी महाविद्यालय-पिरळ पूल-मार्ग प्रजिमा २९ वरुन व कोकणातील वाहने फोंडा घाट दाजीपूर – कारीवडे- पडळी-पिरळ पूल-राधानगरी या मार्गाने वळवावीत. तसेच अवजड व मोठी वाहतुक रस्त्यावरुन पुर्णपणे बंद करुन कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा-नांदगाव-तरेळे वैभववाडी-गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात येत आहे. तर कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता मुदाळतिट्टा- आजरा – आंबोली – सावंतवाडी अशी वळविण्यात येणार आहेत.
दरम्यान, वेगुर्ला बेळगांव रस्ता रा.मा. १८० कि.मी. ४०/०० ते ५५/०० वरील आंबोली घाटातून मोठी व अवजड वाहने, मल्टी ॲक्सल वाहने तसेच २० टनावरील वाहतुकीसाठी मनाई करण्यात आलेली आहे. सदर रस्त्यावरील कि.मी. ५४ / २०० वर असलेल्या ब्रिटीशकालीन कमानी पुलाच्या जागी मंजुर असलेल्या नविन पुलाचे बांधकाम होईपर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. अवजड वाहतूकीमुळे सदरचे जुने पुल कोसळून वाहतूक पुर्णपणे बंद होण्याची भिती आहे. सदर रस्ता कोल्हापुर बेळगांवला तळ कोकणातून जोडणारा अती महत्वाचा मार्ग असल्यामुळे सदर रस्त्याच्या वाहतूकीचे गांभिर्य लक्षात घेता अवजड वाहतूक या मार्गाने वळविणे अत्यंत धोक्याचे आहे. त्यामूळे स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार तसेच सामाजिक संस्थांनीही याबाबत पुढाकार घेऊन १ एप्रिल पासून वळविण्यात येणारी ही वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याशी याबाबत संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. आंबोली घाटातून मल्टी ॲक्सल वाहनांना बंदी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, केवळ मल्टी ॲक्सल वाहने बंद करणे चुकीचे असून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी यापूर्वी ९ डिसेंबर २०२० रोजी सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या पत्रानुसार आंबोली घाटातून मोठी व अवजड वाहने, मल्टी ॲक्सल वाहने तसेच २० टनावरील वाहतुकीसाठी मनाई करण्यात आली असल्याचे म्हटले होते. तसेच याबाबतच्या सूचना सर्व चेकपोस्टना करण्यात याव्यात अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अवजड वाहतूक आंबोली घाटातून वळविल्यास घाट मार्गास होणाऱ्या संभाव्य धोक्यास जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आंबोली घाट २०१९ पासून धोकादायक झाला आहे. त्यामुळे घाटातून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरुन होणारी अवजड वाहतूक घाट मजबूत होईपर्यंत बंद करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान रात्री बारा नंतर नजर चुकवून या रस्त्यावरुन अवजड वाहतूक होत असल्याची माहिती मिळते. त्यामुळे दर महिन्याचे सीसीटीव्ही फुटजे आपण माहितीच्या अधिकारात घेवून संबंधितांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम बंगळुरू : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…