Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीशेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित

शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित

सरकारकडून ७० टक्के मागण्या मान्य

शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांची आंदोलन मागे घेतल्याची घोषणा

ठाणे : नाशिकहून मुंबई विधानसभेच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे नेते जीवा पांडू गावीत यांनी ही घोषणा केली. राज्य सरकारने आमच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत, असे जीवा पांडू गावित यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवेदनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगतानाच गावित यांनी पोलीस, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले.

शेतकऱ्यांचा लाँग मार्च आज ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी नेते जे. पी. गावित म्हणाले, स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ही माहिती देऊन त्याबाबतचे निवेदन पटलावर ठेवले आहे. सर्व मोर्चेकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. तसेच, उर्वरित मागण्याही लवकरच मान्य होतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे गावित म्हणाले.

कांदा उत्पादकांना अनुदान द्यावे, जमीन कसणाऱ्या आदिवासींच्या नावावर ती जमीन करावी, कर्ममाफी द्यावी, यासह १४ प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च काढण्यात आला होता. किसान सभेच्या शिष्टमंडळांसोबत गुरुवारी सायंकाळी विधान भवनात अडीच तास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. या बैठकीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदन केले. त्यात कांदा अनुदानात ५० रुपयांची वाढ करून आता ३५० रुपये करण्यात आली आहे. तसेच वनजमिनींबाबत मंत्री, शासकीय अधिकारी आणि भारतीय किसान सभेच्या नेत्यांची संयुक्त समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, आश्वासनाचे आदेश काढल्याशिवाय ठाणे येथून आंदोलक उठणार नाहीत, असा इशारा भारतीय किसान सभेने दिला होता. मात्र, आज आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा माजी आमदार आणि किसान सभेचे नेते जे. पी. गावित यांनी केली.

आज पत्रकार परिषदेत जे. पी. गावित म्हणाले की, आता सध्या आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत. आमच्या उर्वरित मागण्या विचाराधीन असल्याचे सरकारने सांगितले आहे. सरकारने आतापर्यंत जे निर्णय घेतले आहे, त्यामुळे आता आंदोलन स्थगित करत असलो तरी मोर्चेकरांशी चर्चा करू व त्यानंतर आंदोलन पुढे न्यायचे की मागे घ्यायचे, याचा निर्णय घेणार असल्याचे गावित म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -