कोल्हापूर: जुन्या पेन्शनवरून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करुन सामान्य नागरिकांना वेठीस धरलंय. या विरोधात आज कोल्हापुरात बेरोजगार तरूण आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी हातात धरलेल्या एका पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या मोर्चाला दसरा चौकातून सुरूवात करण्यात आली. यात मोर्चेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘जुनी पेन्शन बंद करा, ती लागू करू नका. आम्ही अर्ध्या पगारावर कामाला तयार आहोत’. अशा आशयाचं पोस्टर मोर्चेकऱ्यांनी हातात धरले होते. या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधलं.
तसेच, जुन्या पेन्शन योजनेला एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीदेखील विरोध केला आहे. या विद्यार्थ्यांनी रखडलेल्या विविध पदांवरील भरती लवकर करण्याचीही मागणी केली आहे. आम्हाला पेन्शन नको पण पगार वेळेवर द्या अशी मागणी या विद्यार्थांची आहे.
तर, दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपाबाबत विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवेदन दिले. जुन्या पेन्शन योजनेचा सखोल अभ्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली जाईल असे म्हणत कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनानंतरही कर्मचारी संपावर ठाम असून, आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.