पेन्शन अभ्यास समिती नेमणे हा सरकारचा निव्वळ वेळकाढूपणा, कर्मचारी संतप्त, समिती अमान्य!
जुनी पेन्शन योजना परिपूर्ण आहे, त्याची नियमावली व तपशील उपलब्ध असताना पुन्हा अभ्यास कशासाठी? – विश्वास काटकर
मुंबई : “सरकार जुन्या पेन्शनचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमून वेळ काढत आहे. वर मेस्मा कायदा वापरून संप चिरडून टाकत आहे. सरकारच्या या धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे सरकारकडून सकारात्मक निर्णय येईपर्यंत संप सुरूच राहणार,” असा ठाम निर्धार राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी व्यक्त केला आहे.
आंदोलनाची दिशा मांडताना ते म्हणाले की, “आज नव्या योजनेतून कर्मचाऱ्यांना फक्त हजार ते दोन हजार रुपयांची दरमहा पेन्शन मिळते. त्यामुळे वृद्धापकाळात तो अधिकच असाह्य होतो. आर्थिक स्त्रोत उपलब्ध नसल्याने हलाखी होते. त्यामुळे जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी आवश्यक आहे.”
महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी-शिक्षकांच्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यात आज प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य सेवा विषयक कामकाज ठप्प झाले होते.
विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून संपकाळात शैक्षणिक संस्था रुग्णालये येथील तातडीच्या कामासाठी/सेवेसाठी संघटनेने अंतर्गत मदतनीस समुहाची निर्मिती केली आहे. त्यामुळे परीक्षा व अत्यवस्थ रुग्णसेवा बाधीत होणार नाहीत. ही अडचणीच्या वेळची तातडीची उपाययोजना जाणीवपूर्वक आण्यात आली आहे.
दि. १४ मार्च रोजी शासनाने घाईगर्दीने पेन्शन विषया संदर्भात तीन माजी अधिका-यांची समिती स्थापन केली आहे. सदर समितीमार्फत ते जुन्या पेन्शन संदर्भातील दुस-या पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वास्तविक सध्या अस्तित्वात असलेली जुनी पेन्शन योजना (OPS) परिपूर्ण अवस्थेत उपलब्ध आहे. त्यामुळे दुसन्या पर्यायांचा अभ्यास करणे म्हणजे केवळ वेळकाढूपणा दिसून येतो. त्याचा दुसरा छुपा अर्थ म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करण्यास दर्शवलेला नकार दिसत आहे. त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी- शिक्षक अधिक संतापले आहेत. शासनाने कर्मचारी-शिक्षकांच्या वेदना लक्षात घेऊन तत्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असेही विश्वास काटकर यांनी स्पष्ट केले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होत नसल्यामुळे उद्या १६ मार्च रोजी संप आंदोलन सुरुच राहणार आहे, असे विश्वास काटकर यांनी म्हटले आहे.