मुंबई (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस मुंबईची लोकसंख्या वाढत असून सध्या असलेले पाण्याचे स्तोत्र कमी पडत आहेत. मुंबईकरांची वाढती पाण्याची तहान भागवण्यासाठी आता महापालिकेच्या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात जल शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच विहार तलावातील वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १२ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईकरांची पाण्याची तहान भागवण्यासाठी सद्य स्थितीत मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मात्र मुंबईची वाढती लोकसंख्या पहाता भविष्यात मुंबईची तहान भागवण्यासाठी दररोज ४ हजार ५०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. वेळेवर पाऊस न आल्याने धरण क्षेत्रात पाणीसाठा कमी कमी होत जातो आणि मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागते. २०२२ मध्ये ही अशीच स्थिती राहिल्याने पालिकेने मुंबईत २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणी कपात लागू करावी लागली होती. त्यामुळे मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी पालिका नव्या उपाययोजना करीत आहे. या प्रकल्पासाठी विहार सरोवर येथे पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. हे पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून भांडूप जल शुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल. या ठिकाणी शुद्धीकरणाच्या सर्व प्रक्रिया करून हे पाणी पिण्यासाठी पुरवले जाईल. दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून खर्चही वाढणार आहे. यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीनंतर किती पाण्यावर प्रक्रिया केली जाणार? हे निश्चित होणार आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले .