Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीआता साईभक्तांना मिळणार थेट समाधीला हात लावून दर्शन

आता साईभक्तांना मिळणार थेट समाधीला हात लावून दर्शन

शिर्डी : शिर्डीत साईबाबांच्या समाधी समोर लावण्यात आलेल्या काचा हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय साई संस्थानने घेतला आहे. त्यामुळे साईभक्तांना पूर्वीप्रमाणे समाधीवर डोके टेकवता येणार असून हस्त स्पर्श करुन समाधीचे दर्शन घेता येणार आहे. ग्रामस्थ आणि भाविकांच्या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे यांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात यांना मंदिरातील काचा आणि जाळ्या काढण्याच्या सूचना केल्या होत्या. शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान प्रशासन यांच्यात बुधवारी (9 नोव्हेंबर) पार पडलेल्या बैठकीत, समाधीसमोरील काचा आणि जाळी हटवण्यासोबतच आणखी काही निर्णय घेण्यात आले आहेत.

साई भक्तांचे दर्शन अधिक सुकर व्हावे यासाठी शिर्डीकरांच्या मागणीनुसार सामान्य भाविकांना साई मंदिरातील समाधी पुढील काच काढून दर्शन देणे, गर्दीच्या वेळी कमी उंचीची काच लावणे, द्वारकामाई मंदिरात आतील बाजूला भाविकांना प्रवेश देणे, ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर गेटवर येण्या-जाण्याकरता मार्ग मोकळा करणे, साईंची आरती सुरु असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा करु देणे, मंदिर परिसरात लावण्यात आलेले जास्तीचे बॅरिगेट काढणे आणि श्री साईसच्चरित हे काही भाषेमध्ये कमी आहे ते लवकरात लवकर उपलब्ध करुन देणे, आदीबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीमध्ये 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 15 दिवसांत तब्बल 18 कोटी रुपयांचे भरभरुन दान भाविकांनी साईंच्या चरणी अर्पण केले आहे. यामध्ये रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, चेक, सोनं, चांदी, परकीय चलन यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -