हिंदुत्ववासाठी आवाज उठवा, नितेश राणे तुमच्या पाठीशी

Share

कडवट हिंदुत्ववादी राज्याच्या गृहमंत्रीपदी आहे, त्यामुळे चिंता नसावी

कोल्हापुर : ‘तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या. तुम्हाला पुढे कसे सुखरुप घरी पाठवायचे हे नितेश राणे पाहून घेईल. मी तुम्हाला शब्द देतो. कारण तिथे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून बसले आहेत, हे लक्षात ठेवा. एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत. त्यामुळे तुम्ही काहीच चिंता करू नका. फक्त हिंदू समाज म्हणून भीती निर्माण करणे गरजेचे आहे,’ असा ठाम विश्वास भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी दिला.

बुधवारी (२ नोव्हेंबर) कोल्हापुरात लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना बोलत होते.

आमदार नितेश राणे पुढे म्हणाले, ’मुस्लिमांना आंदोलन करण्याची वेळ आली अशी एक घटना दाखवा. त्यांच्या कोणत्याही व्यक्तिकडे किंवा धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिले तर ते त्याला जीवंत ठेवत नाही. अशी असंख्य उदाहरणे मी तुम्हाला देऊ शकतो. मात्र, आपल्याला टोप्या घालाव्या लागतात, गमछे घालावे लागतात, घोषणा द्याव्या लागतात. आपल्याला किरण पावसकर, नितेश राणे लागतात आणि मगच आपण काहीतरी करतो. हीच आपली शोकांतिका आहे,’ असा संताप आमदार नितेश राणेंनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

“चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी”

“आम्ही भाषणे देण्यासाठी इथे जमलेलो नाही. चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही. मी मरताना ते आमदार पद लागणार नाहीये. मी मरताना एक हिंदू मेला असं ते लोक सांगणार आहेत. म्हणून हिंदू म्हणून तुम्ही कसे जगणार आहात, हिंदू म्हणून आपल्या धर्माचे कसे रक्षण करणार आहात, हे आज ठरवण्याची गरज आहे,” असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.

‘तुम्हाला जय श्रीराम म्हणण्याचा काय अधिकार आहे?’

‘नगरमध्ये एका हिंदू मुलाने एका मुस्लीम तरुणीशी लग्न केले. त्यानंतर तिकडच्या सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन त्या मुलाला ठेचून काढले. कारण तो मुलगा हिंदू होता. ते लोक धरणे देत बसली नाही, टोप्या घालत घोषणा देत बसली नाही. घरात माता-भगिणी सुरक्षित नसतील तर तुम्हाला जय श्रीराम म्हणण्याचा आणि भगव गमछा घालण्याचा काय अधिकार आहे?’ असा सवाल राणेंनी विचारला.

पळवून नेलेली मुलगी तात्काळ आली नाही तर कोल्हापुरात तांडव होईल…

कोल्हापूरमध्ये लव जिहाद घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून कोल्हापूरमधून ज्या मुलींना पळवून नेण्यात आले या मुली दोन दिवसांत घरी आल्या नाहीत तर कोल्हापूरमध्ये तांडव करू असा स्पष्ट इशारा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने लव जिहाद विरोधात आंदोलन केले असून यावेळी १५ दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून देखील पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी आणि हिंदुत्ववादी संघटनेनी केला आहे. यामुळे आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितित जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

तुम्ही काय करता, जमत नसेल तर वर्दी सोडून द्या…

यावेळी राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत आणि दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री नाही हे लक्षात ठेवा. आता सरकार बदललेलं असून राज्यात भाजपचं सरकार आहे. १७ ऑक्टोबराला मुलगी हरवल्याची फिर्याद दिल्यानंतरही तपास होत नाही. फोन केल्यानंतर पोक्सो कलम लावले जाते. अजूनही मुलगी घरी आलेली नाही. तुम्ही काय करता, जमत नसेल तर वर्दी सोडून द्या अशा शब्दात राणे यांनी या अधिकाऱ्यांना सुनावले. त्याआधी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घोषणा देत माजी मंत्री हसन मुश्रीफ, नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी भाजपच्या पदाधिकार्‍यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदू मुलींना फसवण्यासाठी रेटकार्ड तयार झाले आहेत…

हिंदू मुलींना फसवण्यासाठी पैसे आणि ताकद दिली जाते. या सगळ्या घटनांचे रेटकार्ड तयार झाले आहेत. या प्रकरणी मी विधानसभेतही बोललो असून मुस्लिम धर्मातील विचारवंतांना आवाहन करतो की अशा पद्धतीच्या तरुणांना समजवून सांगा, राज्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत. ज्या-ज्या मुलींची तक्रार असेल त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. कोणत्याही पोलिसांना घाबरण्याची गरज नाही. गृहमंत्री म्हणून कडवट हिंदुत्ववादी देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. तसेच जर पोलिसांना नीट काम करता येत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात म्हणत संताप व्यक्त केला आहे. तसेच पळवून नेलेली मुलगी तात्काळ आली नाही तर कोल्हापुरात तांडव होईल असा थेट इशारा नितेश राणे यांनी पोलिसांना दिला आहे.

‘नालायक पोलिसांना तर शिक्षा मिळणारच’

नितेश राणे पुढे म्हणाले, ‘मी सगळ्या पोलीस खात्याला दोष देत नाही. सगळे पोलीस तसे नसतात, पण काही मोजके जे नालायक आहेत, त्यांना तर शिक्षा मिळणारच हा शब्द मी तुम्हाला देतो. मात्र, सगळ्याच पोलिसांना जे बोलले जात आहे ते चुकीचे आहे. आज राज्यात हिंदुत्वाच्या विचाराचे सरकार आहे. आज राज्याचा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक नाही, हसन मुश्रीफ मंत्री नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही. हिंदूकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याचा सत्कार व्हायला हे मविआ सरकार नाही.” असे सांगत त्यांनी मविआच्या तत्कालीन सरकारवर टीका केली.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

4 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

16 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

21 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

51 minutes ago