Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा भाजपाचीच बाजी

ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा भाजपाचीच बाजी

मुंबई : राज्याच्या ११४१ ग्रामपंचायतींसाठी काल झालेल्या निवडणुकांमध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. संध्याकाळपर्यंत प्राप्त झालेल्या निकालानुसार ८८९ ग्रामपंचायतींपैकी ३९७ ग्रामपंचायतीत भाजपाने विजयी पताका फडकवली. त्यांच्या साथीला असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना, या पक्षाने ८१ जागा मिळवल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ८७, काँग्रेसला १०४, राष्ट्रवादी काँग्रेसला ९८, आणि अपक्षांना ९५ जागा मिळाल्या.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालांवर आमचे संपूर्ण लक्ष होते. कुठे आमचे सरपंच निवडून आले, कुठे पंचायत समित्या निवडून आल्या याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आम्ही या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे, आम्हीच नंबर वन ठरलो आहोत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आम्ही तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या युतीने महाविकास आघाडीपेक्षा फार मोठी आघाडी या निवडणुकीत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. जनतेने आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला याबद्दल त्यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा भाजपाच नंबर वन – चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक ३९७ ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नंबर वन पक्ष ठरला आहे. या यशाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने नव्या सरकारला आणि भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाला सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. त्यांच्या विकासाच्या कामगिरीला जनतेची पुनःपुन्हा पसंती मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही हेच दिसून आले आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांच्या निकालात भाजप शिंदे गटाचा वरचष्मा दिसून येत आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींपैकी ७४ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. १ हजार ७९ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले.

भिवंडीतील शिरोळे ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा

भिवंडीतील शिरोळे ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा फडकवला आहे. येथे मनसेचा सरपंच निवडून आला असून एकूण ९ सदस्यांपैकी मनसेच्या ६ सदस्यांनी विजय मिळवला आहे.

रायगड जिल्ह्यात भाजपने एका ग्रामपंचायतीवर तर शिंदे गटानेही एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -