मुंबई : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केला आहे. यावर बंडखोर आमदारांवर संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेनंतर आता मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांना राजसाहेबांनीच संपादक केल्याची आठवण करून दिली. देशपांडेंनी ट्विटरवरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करून म्हटले की, "दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरीवाला, भाजी विकणारा, वॉचमन म्हणणाऱ्या लोकांनी हे विसरू नये, ते स्वतः लोकप्रभामध्ये कारकून होते. तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामनाचे संपादक बनवलं."
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1541617765336989702
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली होती. या बंडखोर आमदारांना शिवसेनेनेच सर्वकाही दिल्याचे ते म्हणाले होते. काही जण रिक्षा चालवत होते, काही पानटपरी चालवत होते, काही जण वॉचमन होते पण आज शिवसेनेमुळे त्यांना मंत्रिपदे मिळाल्याचेही ते म्हणाले होते.