बंगळुरू जून (हिं.स) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बंगळूरु येथील राष्ट्रीय लष्करी विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी विद्यार्थी, शिक्षक तसेच माजी विद्यार्थ्यांसह संपूर्ण कर्मचारी वृंदाचे अमृत महोत्सवानिमित्त अभिनंदन केले. ते म्हणाले की, स्थापनेपासूनच उज्ज्वल कामगिरी करत देशातले सर्वोत्तम निवासी विद्यालय म्हणून या विद्यालयाने नाव लौकीक मिळवला आहे. देशातल्या 23 राज्यांमधले विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
राष्ट्रपती म्हणाले की, या विद्यालयात शिक्षण घेत असलेले जम्मू काश्मीरपासून केरळपर्यंतचे विद्यार्थी हे देशाच्या विविधतेतून एकतेचे प्रतिक आहेत. या प्रकारे एकमेकांच्या सहवासामुळे हे विद्यार्थी आपल्या सहाध्यायांच्या भाषा, संस्कृती आणि परंपरांशी नक्कीच परिचित झाले असतील असे राष्ट्रपती म्हणाले.या शैक्षणिक वर्षापासून देशभरातल्या सर्व राष्ट्रीय लष्करी विद्यालयात मुलींनाही प्रवेश दिला जाणार आहे याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. देशाच्या कन्या वेगवेगळ्या क्षेत्रात नव नवे विक्रम स्थापन करत असून देशाला त्यांचा सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले.
लढाऊ गटांसह सशस्त्र दलात महिलांची वाढती संख्या पाहता तिन्ही दलांचा प्रमुख म्हणून आपल्याला आनंद होत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. या प्रतिष्ठित विद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुली देश संरक्षणात आणि राष्ट्र उभारणीत आपले उत्कृष्ट योगदान देतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.या विद्यालयाचे ‘शीलं परम भूषणं’ अर्थात चरित्र्य हाच सद्गुण हे ब्रीदवाक्य विद्यार्थ्यांना सदैव मार्गदर्शक ठरेल, असे राष्ट्रपती म्हणाले. हे विद्यालय विद्यार्थ्यांना समग्र शिक्षणासह शिस्त, लष्करी नीतिशास्त्र याचे ज्ञान देण्याचे पवित्र कार्य निरंतर करत राहील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.