पीयूष गोयल यांनी वस्त्रोद्योग सल्लागार गटाशी साधला संवाद

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी मुंबईतील इंडियन मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री येथे नव्याने स्थापन वस्त्रोद्योग सल्लागार गटाशी संवाद साधला. कापसाचा पुरवठा आणि उत्पादकता वाढवणे यासंबंधीच्या मुद्द्यांवर या बैठकीत भर देण्यात आला होता.


वस्त्रोद्योग सल्लागार गटामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग, कृषी आणि शेतकरी कल्याण, वाणिज्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, भारतीय कापूस महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, संशोधन आणि विकास तज्ज्ञ आणि हितधारकांचा समावेश आहे.


उत्पादन क्षमतेवर परिणाम करणाऱ्या घटकांना कालबद्धरीत्या प्रकल्प पद्धतीने हाताळण्यावर गोयल यांनी भर दिला. जिनिंग कार्यक्षमता आणि उत्पादन सुधारण्यासाठी उद्योगांनी मॉडेल विकसित करावेत असे आवाहनही त्यांनी केले.


"वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील अचूक आकडेवारीमुळे उत्तम धोरण आखणी, व्यापार सुलभता आणि मागोवा घेण्यास मदत होते" असे गोयल म्हणाले. या संदर्भात, त्यांनी कॉटन असोसिएशन, जिनर्स तसेच भारतीय वस्त्रोद्योग महासंघ आणि सदर्न इंडिया मिल्स असोसिएशनच्या सूचनांसह एक पोर्टल तयार करण्याचे निर्देश दिले. “पोर्टलने स्वयं अनुपालन पद्धतीने काम केले पाहिजे. जर प्रोत्साहन आणि स्वयं-अनुपालनाने परिणाम साधले जात नसतील, तर भारतीय कापूस महामंडळ अशा दोषींबरोबर व्यवसाय करणार नाही अशी दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते असे ते म्हणाले.


गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्यापासून कापूस पिकाचे संरक्षण करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. कीटकांचे पुनरुत्पादन रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेरोमोन ट्रॅप तंत्रज्ञानाचा सक्तीने वापर करण्याबाबत प्रत्येकाने संवेदनशील असावे, अशी सूचना त्यांनी केली. “पीक वाचवण्यासाठी जिनिंग विभागाने जबाबदारी स्वीकारावी आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेरोमोन ट्रॅप तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य करावा,” असे ते पुढे म्हणाले.


चालू हंगामासाठी समर्पित कृतीवर लक्ष केंद्रित करून बियाणाच्या गुणवत्तेच्या मूळ मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. सुप्रसिद्ध कापूस तज्ज्ञ आणि वस्त्रोद्योग सल्लागार गटाचे अध्यक्ष सुरेश कोटक यांनी विशेषतः लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांच्या पेरणीसाठी बियाणे वेळेवर उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांना योग्य आणि बनावट बियाणांमधील फरक समजावा यासाठी कृषी क्षेत्रात जनजागृती मोहीम राबवण्याच्या गरजेवर गोयल यांनी भर दिला. वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय, मुंबई आणि भारतीय कापूस महामंडळ, नवी मुंबई यांनी संयुक्तपणे ही बैठक आयोजित केली होती.

Comments
Add Comment

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध