मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागण्यासाठी मुंबईसह राज्यात काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत असताना लोकांची मोठी गैरसोय होते. म्हणूनच हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
“महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांच्या विचारांचा अपमान नरेंद्र मोदींनी केला असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला असून आम्ही त्याचा निषेध करतो. भाजपानेच लोकांना रस्त्यावर आणले असून भाडोत्री लोकं उतरवली आहेत. त्यांनीच रस्ता जाम केला. ही महाराष्ट्रद्रोही भाजपा असल्याचं यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे. त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागत आहे. आजचं आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेत आहोत. पण हे आंदोलन सर्व खासदारांच्या घरासमोर सुरु ठेवण्याची भूमिका स्पष्ट आहे,” असं नाना पटोले म्हणाले. आंदोलनाची पुढील तारीख आम्ही सांगू असंही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “आमचं आंदोलन झालं आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पण भाजपाच्या लोकांनी आज मुंबईकरांना अडवलं. आम्हालाही गुंडगिरी करता येते, पण ही आमची संस्कृती नाही”.
“भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाऱाष्ट्राला दाखवला आहे. मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल, राज्यातील सर्व संपत्ती विकून गुजरातला नेली तरी चालेल पण आम्ही मोदींचं समर्थन करुन अशी भाजपाची वृत्ती आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. आम्ही आंदोलन मागे घेतलं नसून लोकांची गैरसोय म्हणून ते तात्पुरतं स्थगित केलं आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.