Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमीरत्नागिरीसिंधुदुर्ग

कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा

कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा

देवा पेरवी

पेण : पेण रेल्वे स्थानकात जलदगती गाड्यांना थांबा मिळावा या पेणकरांच्या मागणीला यश आले असून दिवा - रत्नागिरी - दिवा या पॅसेंजर गाडीला आता पेण बरोबरच आपटा, जिते व कासु रेल्वे स्थानकात थांबा मिळाला असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. पेण येथील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला असून भाजप उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यानुसार १५ जानेवारीपासून दिवा - रत्नागिरी - दिवा ही पॅसेंजर रेल्वे गाडी पेण, जिते, आपटा, कासु व नागोठणे बरोबरच रोहा येथील स्थानकात थांबणार आहे. कोरोना काळात बंद असलेली मेमु गाडी सुरु करण्यासाठी देखील पेण मधील नागरिकांना संघर्ष करावा लागला होता. पेण येथील रेल्वे प्रवाशांना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नेहमीच सापत्न वागणूक दिली आहे. रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती स्थानक असलेल्या पेण स्थानकात एकही जलदगती रेल्वे गाडीला थांबा नसल्याने पेण, वडखळ, अलिबाग, पोयनाड, मुरूड परिसरातील प्रवाशांना जलदगती गाडीसाठी पनवेल, कल्याण, कर्जत, लोणावळा व मुंबई येथे जावे लागत आहे. पेण रेल्वे स्थानकात जलदगती रेल्वेगाडीला थांबा मिळावा यासाठी ‘मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत विकास संघर्ष समिती’ आणि पेण येथील रेल्वे प्रवाशांबरोबरच रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. वैकुंठ पाटील यांनी या बाबत तीन महिन्यांपूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील रेल्वे मुख्यालयात भेट घेऊन चर्चा करुन पेणच्या प्रवाशांच्या लेखी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या होत्या. याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले होते.
Comments
Add Comment