नाशिक: सध्या देशात, राज्यासह नाशिक शहरातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकही व्यापक प्रमाणात कोरोनाबाधीत होत आहेत. त्यामुळे स्वत:ला कोरोनापासून वाचविण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाय करून दक्षता घ्यावी, असे आवाहन नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी यांनी जनतेला केले आहे.
तिसऱ्या लाटेच्या तीव्रतेबाबत आढावा घेतला असता दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. दि. १ जानेवारी रोजी शहरात ७१ कोरोना रुग्ण होते. नंतर दि. २ रोजी ८८, दि. ३ रोजी १५१, दि. ४ रोजी २७६ अशा चढ्या क्रमाने नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून बुधवारी ५ जानेवारीला तब्बल ४१३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असल्याने वेळीच सावध होऊन संभाव्य तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी नाशिककर जनतेने योग्य ती दक्षता घेऊन, नियमांचे पालन करून सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असेही महापौर कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
आजमितीस एकूण ५०० अॅक्टीव रुग्णांपैकी ६९ रुग्ण मनपा रुग्णालयात उपचार घेत आहेत. यासर्व परिस्थितीचा विचार करता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सुरक्षितता मिळविण्यासाठी खबरदारीचे उपाय अथवा प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत शहरात १०० टक्के लसीकरण होणे हाच एक पर्याय आहे. यामध्ये ज्या नागरिकांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. त्याचबरेाबर टेस्टींगची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे शाळा बंद ठेवणे हिताचे होईल.
सार्वजनिक ठिकाणी, सभा, समारंभ, लग्न समारंभ व गर्दीच्या ठिकाणी नागरिक नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगत मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहिमेअंतर्गत आधार कार्ड किंवा आय कार्डवर देखील लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश दिले आले. शहरातील सर्वच्या सर्व ७० कोवीड सेंटर पुन्हा येत्या ३ ते ४ दिवसांत वेगाने कार्यान्वित करण्यात येतील.
त्याचप्रमाणे ज्या नागरिकांनी लस घेतलेली असेल तरी त्या नागरिकांनी कोरोनास प्रतिबंध म्हणून जलनेती, प्राणायाम, होमिओपॅथी, आयुर्वेदिक उपाय करणे गरजेचे असल्याचेही महापौर म्हणाले. शहर पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने न्यायाचे की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहायचे याचा विचार सर्वच नागरिकांनी करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.