मुंबई : नुकतीच फॉर्चून इंडियाने भारतातील ५० शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, भारतातील सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण या अग्रस्थानी आहेत. त्यानंतर रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी आणि तिसऱ्या स्थानी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे.
या यादीत ईशा अंबानीचेही नाव आहे. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलची डायरेक्टर ईशा ही सर्वात तरुण प्रभावशाली महिला आहे. तिचे वय फक्त ३० वर्षे आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू झाल्यानंतर ३६ तासांनी पत्रकार परिषद घेतली होती. अशी पत्रकार परिषद घेणाऱ्या त्या पहिल्या केंद्रीय मंत्री आहेत.
तसेच त्यावेळी संपूर्ण देशाला कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारच्या योजनांबद्दल जाणून घ्यायचे होते. त्या भयंकर काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली, असे फाॅर्चून इंडियाने निर्मला सीतारामण यांच्याबद्दल सांगितले आहे.