Wednesday, July 9, 2025

राज्यात १ डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू

राज्यात १ डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील कोविड-१९ची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी दिली.


कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते. कोविड-१९चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवीपासून, तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.


आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत तसेच पीडियाट्रिक टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर येत्या १ डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन सुरक्षितपणे शाळा सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.


टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यातील हा तिसरा टप्पा आहे. या कालावधीत सुरक्षित वातावरणात शिक्षण सुरू राहण्यासाठी यापुढेही कोविड-१९ संदर्भातील दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. काही विद्यार्थी पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येतील, त्यांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे ही आपली प्राथमिकता असेल, असे त्या म्हणाल्या.


याबाबत सातत्याने मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात येणार असून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा