Wednesday, March 19, 2025
Homeमहत्वाची बातमीठाकरे सरकारची दडपशाही

ठाकरे सरकारची दडपशाही

२२९६ रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी ठाकरे सरकारने दडपशाही सुरू केली आहे. २२९६ कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. या कामगारांनी २४ तासांत कामावर हजर व्हावे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असे नोटीशीत म्हटले आहे.

एसटी महामंडळाने आतापर्यंत २१७८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान, निलंबनाच्या भीतीपोटी बुधवारपर्यंत आठ हजार कर्मचारी कामावर हजर झाले. सध्या एसटीची हजेरी पटावरील एकूण कामगारांची संख्या ९२,२६६ इतकी आहे. तर सध्या हजर कर्मचाऱ्यांची संख्या ७,४०० आहे. यामध्ये ५२२४ प्रशासकीय कर्मचारी, १७७३ कार्यशाळा कर्मचारी, २६४ चालक आणि १९३ वाहक आहेत. प्रत्यक्षात संपामध्ये भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८४, ८६६आहे.

आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवला. रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी आझाद मैदानात आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हा लढा आणखी तीव्र करावा लागेल असं रामदास आठवले यांनी म्हटले.

वैद्यकीय भत्ता ५६ रु. धुलाईपोटी अवघे १०० रुपये

एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्ता म्हणून अवघे ५६ रुपये मिळतात. प्रवाशांच्या सातत्याने संपर्कात राहणाऱ्या एसटी चालक-वाहकाला धुलाई भत्त्यापोटी अवघे १०० रुपये मिळत असल्याचे वास्तव आहे.एसटी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अतिशय कमी आहे. अशातच मिळणारे भत्तेही कमी असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. यामुळे कर्मचाऱ्यांवर एसटी बँक आणि स्थानिक पतपेढ्यांकडून कर्ज काढण्याची नामुष्की ओढावते. कोरोना काळात मुंबईतील रेल्वे सेवा बंद होती. त्यावेळी बेस्टच्या जोडीला अत्यावश्यक सेवा म्हणून १ हजार गाड्या मुंबईत धावल्या. अशावेळी ६५ रुपये वैद्यकीय भत्ता देऊन कर्मचाऱ्यांची थट्टाच केली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेची धास्ती असताना तुटपुंज्या भत्त्यावर लाखोंची बिले कशी चुकविणार, असा संपकरी एसटी कामगारांनी उपस्थित केला आहे.

दोन कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उस्मानाबाद/सातारा (वार्ताहर) : एसटी संप कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतू लागला आहे. राज्यात बुधवारी दोन एसटी कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाले आहेत. निलंबनाच्या भीतीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सहकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे. ३२ वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथील एका ३२ वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. किरण घोडके असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. किरण हे अक्कलकोट आगारात चालक या पदावर कार्यरत होते. सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते.

साताऱ्यातील संतोष शिंदेंचा मृत्यू

साताऱ्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याला तणावातून हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचे निधन झाले. संतोष शिंदे (राहणार आसगाव) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो मेढा एसटी डेपोत कर्मचारी होतो. तटपुंजा पगार आणि संपामुळे ते तणावाखाली होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.राज्य सरकारने संप संपवण्यासाठी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहेत. आपल्या इतर सहकाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईमुळे किरण घोडके देखील अस्वस्थ झाले होते. मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाले. निलंबनाची कारवाई होईल, या भीतीने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

परिवहन मंत्र्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : भाजप

कामगार मृत्यू प्रकरणी परिवहन मंत्र्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. सरकार किती निष्पाप एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेणार आहेत. दबावतंत्राचा वापर करुन कर्मचाऱ्यांना कामावर बोलावयाच्या या पध्दतीमुळे कर्मचारी तणावाखाली येत आहेत. त्यातूनच ही दुदैर्वी घटना घडली असावी. त्यामुळे महाविकास आघाडी सरकराने आता तरी जागे व्हावे व या गंभीर घटनेची दखल घेऊन घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असेही दरेकर यांनी म्हटले केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -