मुंबई (प्रतिनिधी): राज्यभरात दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रझा अकादमीवर सरकारने बंदी आणावी. सरकारला हे शक्य नसेल तर रजा अकादमीला कसे संपवायचे हे आम्ही बघून घेऊ, असा इशारा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
प्रभादेवी येथे भाजपच्यावतीने आयोजित मराठी कट्टा कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई भाजप सचिव सचिन शिंदे यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला भाजप नेते विनोद तावडे, नितेश राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्रिपुरामधील घटनेनंतर राज्यात नांदेड येथे काढलेल्या मोर्चाला रजा अकादमीच्या वतीने हिंसक वळण देण्यात आले. रजा अकादमीला कोणाची साथ आहे, हे आम्हाला चांगले माहीत आहे. रजा अकादमीने केलेल्या हिंसक कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर अमरावतीत लाठीचार्ज करण्यात आला. मात्र, राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून व शांतता पसरवणाऱ्या रजा अकादमीवर बंदी आणावी, अशी आम्ही मागणी करतो आहोत. राज्य सरकारने बंदी आणली नाही तर रजा अकादमीला कसे संपवायचे. हे आम्ही बघून घेऊ. मनीष मार्केटमध्ये असलेल्या त्यांच्या कार्यालयात त्यांचे काय करायचे, हे आम्ही पाहून घेऊ, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला फटकारले.
दरम्यान सचिन शिंदे यांनी आयोजिलेल्या या भव्य मराठी कट्टा कार्यक्रमात भाजपच्यावतीने मराठी माणसाला जागरूक करण्याचे काम सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभादेवी विभागात इथल्या स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी स्वतःचे फ्लॅट घेण्यापलीकडे काही केले नाही. अशा लोकांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असून येत्या महानगरपालिकेत मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हटवून भाजपाला मदत करण्याचे आवाहन माजी मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केले. प्रभादेवी इथल्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचे नाव लिहिलेले नाही. त्यामुळे वर बापाला आणि खाली मुलाला मत दिलेच पाहिजे, असा काही नियम नाही. एकदा भाजपवर विश्वास ठेवून कमळा पुढील बटन दाबा, असे आवाहनही तावडे यांनी यावेळी केले.