मुंबई (प्रतिनिधी) : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून नियोजित विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे पहिल्या सामन्याचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा उपकर्णधारपद भूषवेल.
कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाची धुरा सांभाळणार आहे. रोहित शर्मासह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि रिषभ पंत यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.पंतच्या अनुपस्थितीत वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. केएस भरत राखीव यष्टीरक्षक असेल. आंध्र प्रदेशचा २८ वर्षीय भरत हा आयपीएलमध्ये बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सकडून खेळला आहे. यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेतील राखीव (स्टँडबाय) पाच क्रिकेटपटूंमध्ये त्याचा समावेश होता.
न्यूझीलंड संघ टी-ट्वेन्टी वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडसोबत कसोटी मालिकेपूर्वी तीन टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका होईल. ही मालिका जयपूर, रांची आणि कोलकाता येथे रंगेल. कोरोनामुळे भारतात गेल्या काही महिन्यात एकही मालिका झालेली नाही. या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक म्हणून रूजू होतील.
भारताचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.