जकार्ता (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताला सोमवारी भूकंपाचे (earthquake) हादरे बसले आहे. तब्बल ५.६ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. या दुर्घटनेत ४६ नागरिकांचा मृत्यू आणि ७०० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
राजधानी जकार्तापासून सुमारे ७५ किमी पश्चिम दिशेला असलेले सियांजूर हे भूकंपाचे केंद्र होते. ५.६ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली सुमारे १० किमी होता. यामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला असून ७०० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती सियांजूरचे अधिकारी हर्मन सुहर्मन यांनी दिली.
या भूकंपामध्ये सियांजूरमधील काही इमारती कोसळल्या आहेत. तर अनेक घरे, शाळा आणि कार्यालयांचेही नुकसान झाल्याचे समजते. तसेच इमारती कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे.