नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्येप्रकरणी (murder) भारतीय व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले आहे. राजविंदर सिंग असे या व्यक्तीचे नाव असून २०१८ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमध्ये एका महिलेची हत्या केली होती. त्यानंतर तो भारतात पळून आला होता.
राजविंदरने टोयाह कॉर्डिंग्ले नामक महिलेची हत्या केली होती. हत्येच्या २ दिवसांनंतर तो पत्नी-मुलांसह नोकरी सोडून पळून गेला होता. यासंबंधीच्या वृत्तानुसार, ऑक्टोबर २०१८ मध्ये २४ वर्षीय टोयाह कॉर्डिंग्ले ऑस्ट्रेलियाच्या केर्न्सहून ४० किमी अंतरावर वांगेटी बीचवर आपल्या श्वानासोबत फिरण्यासाठी आली होती. तेव्हा तिची हत्या करण्यात आली होती.
क्वींसलँड पोलिसांनी गेल्या महिन्यात राजविंदरची माहिती देणाऱ्याला १ दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवले होते. हे क्वींसलँड पोलिसांनी आतापर्यंत ठेवलेले सर्वात मोठे बक्षीस होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, टोयाहची हत्या केल्यानंतर राजविंदर २२ ऑक्टोबर २०१८ रोजी भारतात पळून गेल्याचे आम्हाला ठावूक होते.
२३ ऑक्टोबर रोजी तो सिडनीहून भारताच्या दिशेने निघाला होता. ऑस्ट्रेलियन सरकारने मार्च २०२१ मध्ये भारताकडे राजविंदर सिंग याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. त्याला यंदा नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यासाठी गेल्या महिन्यात पंजाबी व हिंदी अवगत असणारे ऑस्ट्रेलियन पोलीस भारतात आले होते.