दापोली (वार्ताहर) : दापोलीतील बहुचर्चित साई रेस्टॉरंट तोडण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने (High Court) ‘साई रिसॉर्ट’चे मूळ मालक सदानंद गंगाराम कदम यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. तसेच जर रेस्टॉरंट तोडण्यासंदर्भात नोटीस आल्यानंतर उच्च न्यायालयात तातडीने दाद मागण्याची मुभा उच्च न्यायालयाने दिली आहे.
माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालकीचे हे रेस्टॉरंट असल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याची मागणी केली होती. रिसॉर्ट पाडण्यासाठी आलेल्या नोटीस विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये साई रिसॉर्टचे मूळ मालक सदानंद गंगाराम कदम यांनी धाव घेतली होती.
आज झालेल्या सुनावणी दरम्यान साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही. त्यामुळे रेस्टॉरंटवर हातोडा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.