होंगझाऊ: आशियाई स्पर्धा २०२३मध्ये भारत आणि नेपाळ क्रिकेट संघ यांच्यात खेळवल्या जात असेल्या क्वार्टर फायनल सामन्यात भारताचा फलंदाज यशस्वी जायसवालने(yashasvi jaiswal) इतिहास रचला. आशियाई स्पर्धेत शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. जायसवालने ४८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने हे शतक पूर्ण करताना ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले.
जायसवालचे टी-२० आंतरराष्ट्रीयमधील हे पहिले शतक आहे. भारताचा हा फलंदाज पहिल्यापासूनच आक्रमक दिसला. त्याने ४९ चेंडूत १०० धावांची खेळी केली.
सलामीला उतरलेल्या यशस्वी जयसवालने कर्णधार ऋतुराज गायकवाडसह मैदानात उतरत जबरदस्त खेळाचा नमुना सादर केला. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये यशस्वीने याआधी अर्धशतक ठोकले आहे. त्याने २०२३मध्ये खेळवण्यात आलेल्या आयपीएलमध्येही दोन शतके ठोकली होती.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग आहे यशस्वी
जयसवालने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघात प्रतिनिधित्व केले आहे. २०२३च्या हंगामात १४ सामन्यात १४ डावात ४८.०८च्या स्ट्राईक रेटने ६२५ धावा केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय करिअरची चांगली सुरूवात
२१ वर्षीय जयसवालने कसोटी क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पहिल्याच मालिकेत त्याने शतक ठोकले होते. त्याने आतापर्यंत २ कसोटी सामने खेळले आहेत. कसोटीच्या ३ डावात त्याने ८८.६७च्या सरासरीने २६६ धावा केल्या. याशिवाय ६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात जयसवालने ४६.४०च्या सरासरीने २३२ धावा केल्या आहेत.