राजकीय लव्ह जिहाद झालेल्या उद्धव ठाकरेंना राम मंदिराची एलर्जी
आमदार नितेश राणे यांचा घणाघात
मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काल दिल्लीला गेले त्यावर दिल्लीला जाऊन पाय पुसण्याचा कार्यक्रम होतो का?, अशी टीका केली. यावर मविआच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार दहा जनपथला आपल्या मुलाला घेऊन जायचे, ते काय तिथे थाय मसाज द्यायला जायचे का? असं जोरदार प्रत्युत्तर देत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला.
नितेश राणे म्हणाले, एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा राज्यासाठी काहीतरी मिळावं, राज्याचे प्रश्न सुटावेत यासाठी केंद्र सरकारच्या सतत संपर्कात राहावं लागतं म्हणून जातात. तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा त्याने स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी आणि स्वतःच्या मेव्हण्याला वाचवण्यापलीकडे कधीही दिल्लीला जायचा विचार केला नाही. आज जे आमदारकीचं पद तो सगळीकडे मिरवतो ते आमच्या मोदीसाहेबांचंच देणं आहे. त्यामुळे तुझा मालक मुख्यमंत्री होता तेव्हा काय केलं? राज्याला काय मिळावं यासाठी तो कधी दिल्लीला गेला का? १० जनपथला किती भांडी धुतली? तिथे जी मम्मी बसली आहे तिच्या किती पाया पडला? याची माहिती द्यायला भाग पाडू नका, असं नितेश राणे म्हणाले.
आज आमचे पंतप्रधान शिर्डीच्या दौर्यावर येऊन जवळपास सात ते आठ हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. तिकडेही काळी मांजर जशी आडवी जाते तसं याचं म्हणणं आहे की मोदीजींनी मणिपूरलाही जावं. पण दुसर्यांना कुठे जायचं याविषयी सांगण्याअगोदर तुझी गाडी पत्रा चाळीत कधी थांबणार? जेवढे तास आमचे पंतप्रधान आज कार्यक्रम घेणार आहेत तेवढे तास तू पत्रा चाळीत उभा तरी राहून दाखव, काय अवस्था होईल तुझी! जॅकेट घालायच्या तरी लायकीचा राहशील का?, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे यांनी उपस्थित केले खडे सवाल
पीएम केयरवर तू टीका करतोस, मग तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा का चौकशी केली नाही? तेव्हा अजिबात थोबाड उघडलं नाही आणि आता उगाच उठसुठ टीका करताय. जेव्हा प्राईव्हेट विमानाची गरज असते तेव्हा बरोबर अदानीला फोन करता, मग धारावी पुनर्वसनाला विरोध का? तुम्हाला धारावी पुनर्वसनाची चिंता आहे की मातोश्री पुनर्वसनाची चिंता आहे? मोठ्या उद्योजकांविरोधात आवाज उठवता तेव्हा खोके मोजले गेले आहेत का ? याची माहिती आम्हाला महाराष्ट्राला द्यायला हवी, असं नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना राम मंदिराची एलर्जी
‘पहले मंदिर, फिर सरकार’, अशी २०१९ पूर्वी उद्धव ठाकरेचीच घोषणा होती आणि हाच उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांबरोबर औरंग्याजवळ भगवं घालून उभा राहिलेला पाहायला मिळाला. आता त्याचा राजकीय लव्ह जिहाद झाल्यामुळे त्याला मंदिराचीही एलर्जी आहे आणि राम मंदिराचीही एलर्जी आहे. हिंमत असेल तर राम मंदिर उघडल्यानंतर अयोध्येमध्ये जाऊन दाखव. संजय राऊत आणि त्याच्या मालकाची मग काय अवस्था होईल हे एकदाच आमचा हिंदू समाज दाखवून देईल, असं नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे आतंकवाद्यांचं समर्थन करतात का?
काल मुंबईमध्ये पॅलेस्टाईन, हमासच्या समर्थनासाठी अबु आझमी आणि मुस्लिम बोर्डकडून रॅली काढण्यात आली. समाजवादी पार्टी असो किंवा मुस्लिम बोर्डचे लोक, तुम्हाला आठवत असेल की हे लोक काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेला मातोश्रीवर भेटायला गेले होते. हेच लोक जर आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मुंबईत रॅली काढत असतील तर उद्धव ठाकरेही या भूमिकेचं समर्थन करतात का?, असा खडा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. तसेच देशद्रोही अबु आझमीला लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.