मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यातील धसई विभागातील महाज, खेवारे, मांडवत, कळबांड, जायगाव, खेडले, तळवली, कांदली या गावातील शेतकरी वन्य प्राणी व मोकाट जनावरे यांच्यामुळे भात लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
याकडे महसुल, वन व कृषी खात्याने विशेष लक्ष्य देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी सहकारी संघ मुरबाड माजी चेअरमन व कुणबी समाज संघटना मुरबाडचे सरचिटणीस प्रकाश पवार सर यांनी शासनाकडे केली आहे.
महाज येथील मनोहर विनायक सुरोशे या शेतकऱ्याचे जवळ जवळ एक हेक्टर भात शेतीचे वन्य प्राणी व मोकाट जनावरे यांनी ७० ते ८० हजार रुपयाचे नुकसान केले आहे. अशाच प्रकारचे नुकसान अनेक शेतकऱ्यांचे होत आहे. टोकावडे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी सदर नुकसानीचे पंचनामे करून जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
वन्य प्राणी व मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त झाला नाही, तर अनेक शेतकरी पुढच्या काळात भात व भाजीपाला लागवड सोडून देतील असे महाज येथील नारायण वामन सुरोशे या शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. लवकरच मुरबाड तहसीलदार व शासकीय अधिकारी मुरबाड व वनक्षेत्रपाल टोकावडे यांची शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन या वन्य व मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करण्यासाठी बैठक घेण्याचे प्रकाश पवार यांनी ठरवले आहे.