नवी दिल्ली : केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री पीयुष गोयल आणि केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची (ओएसडी) अचानक हकालपट्टी करण्यात आली आहे. ज्या अपॉईंटमेंट कमिटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघे सदस्य आहेत. त्याच कमिटीने हा निर्णय घेतल्याने या तडकाफडकी निर्णयामागची नेमकी गोम काय आहे, यात नेमके काय दडले आहे, याची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात रंगली आहे.
पीयुष गोयल यांचे ओएसडी अनुज गुप्ता आणि स्मृती इराणी यांच्या ओएसडी देवांशी विरेन शाह यांची मुदत संपण्यापूर्वीच त्यांना पदावरुन हटवले आहे.
ओसएडींचा कार्यकाळ सहसा पाच वर्षे किंवा मंत्र्यांची इच्छा असेपर्यंत असा असतो. त्यामुळे मंत्र्यांच्या ओएसडींना हटवणे म्हणजे तो मंत्र्यांसाठीही संदेश मानला जातोच. पण अनुज गुप्ता, देवांशी शाह या दोघांचेही म्हणणे आहे की त्यांनी वैयक्तिक कारणामुळे पद सोडले आहे.
परंतू हे कारण त्यांनी सांगितले असले तरीही गोयल आणि इराणी यांच्या ओएसडींना मुदतीआधीच तडकाफडकी हटवण्यामागच्या मोदी आणि शाह यांच्या या कारवाई मागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या यादीत मोदी-शाहांचे धक्कातंत्र काय असते याचा अनुभव सर्वांना आहे. हर्षवर्धन, रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनी त्याचा अनुभव घेतला आहे.