‘जगी ज्यास कोणी नाही…’

Share

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

एके काळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आकाशवाणीने फार मोठे योगदान दिले आहे. ते इतके प्रचंड आहे की, अनेक पिढ्यांच्या बालपणातल्या आठवणी आणि मनावर नकळत झालेले संस्कार आकाशवाणीशी निगडित आहेत. समाजमनाचे मानसिक आरोग्य जुन्या संतांनी, त्या काळच्या लेखकांनी जाणीवपूर्वक जपले होते. कलेचा आस्वाद घेता-घेता, माणसाच्या मनात उच्च जीवनमूल्यांची जोपासना व्हावी, अशी व्यवस्था केली होती. त्याचे अगदी नितळ प्रतिबिंब आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विविध कार्यक्रमांत उमटवलेले दिसायचे.

सुमारे ४-५ दशकांपूर्वी सकाळच्या प्रसन्न वेळी जवळजवळ प्रत्येक घरात रेडिओ लागलेला असायचा. सुरुवातीला उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला एखादा कर्णमधुर राग लागे. मग ‘विचारपुष्प’ किंवा ‘प्रभातकिरणे’ अशा सदरात चांगले विचार देणारे अतिसंक्षिप्त प्रवचनवजा भाषण होई आणि त्यानंतर भक्तिगीते लागत. दरम्यान उत्तम मराठीत लिहिलेले नेटके, फक्त खरी आणि उपयुक्त माहिती देणारे, एखादे बातमीपत्र येऊन जायचे.

सकाळच्या वातावरणात त्या वेळच्या सरळसाध्या समाजातील माणसांचे मन स्वाभाविकच भक्तीकडे, परमेश्वराच्या आराधनेकडे वळायचे. आकाशवाणीवरचे कार्यक्रमही सर्वसामान्य माणसाच्या या मानसिकतेला अनुकूल असेच असत. लाखो मराठी श्रोत्यांना लतादीदी, सुमन कल्याणपूर, गजाजन वाटवे, सुधा मल्होत्रा, पंडित भीमसेन जोशी, विठ्ठल शिंदे यांनी गायलेली भजने आजही तोंडपाठ आहेत. मधुकर जोशी यांनी लिहिलेले आणि दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेले असेच एक भक्तिगीत आकाशवाणीवर नेहमी लागायचे. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातल्या त्या गाण्यात निराश मनाला उभारी देणारा एक विचार मांडला होता.

जेव्हा माणसाच्या मनाला उदासीनता घेरून टाकते, जीवनात आलेले अपयश अस्वस्थ करते, एकटेपणा खायला उठतो, तेव्हा अशा गाण्यांनी मोठा आधार मिळायचा. दशरथ पुजारी यांनी ‘वैरागी-भैरव’ रागात बसवलेल्या, या गाण्याने अगणित अस्वस्थ मनांना त्याकाळी मोठा दिलासा दिला. गीतकार जोशी यांचे त्या भक्तिगीताचे शब्द होते-

‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे.’

माणसाच्या जीवनात अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की, संकटांवर संकटे येऊ लागतात. सुटकेचा मार्गच सापडत नाही. ‘आपले कुणी नाही, आता कुठूनही मदत येणार नाही’ असे वाटून तो निराश होतो. त्यावेळी कुणीतरी त्याला आधार देणारे चार शब्द सांगितले, तर परिस्थिती जरी बदलत नसली, अगदी तीच राहत असली, तरी मनाला थोडी उभारी येते.

तणाव कमी होऊन थोडे हलके वाटू लागते. सुकून गेलेल्या आशेला नवे कोंब फुटू लागतात. त्यात जर त्या आशा दाखवणाऱ्या व्यक्तीने काही उदाहरणे दिली, तर अजूनच उत्साह जाणवू लागतो. मधुकर जोशींनी गाण्यात अशी उदाहरणे घेतली होती की, ती भारतातल्या तत्कालीन सर्वच लोकांना परिचित होती. चटकन समजण्यासारखी होती. ते म्हणतात, कुंतीने लोकलज्जेस्तव आपल्या पोटी नुकतेच जन्मलेले अनौरस अर्भक सरळ एका टोपलीत ठेवून नदीत सोडून दिले. तिने क्षणभरही हा विचार केला नाही की, अजून कसलेच ज्ञान नसलेले, हे शक्तिहीन बालक खळखळत्या नदीत वाहून जाताना जर ती टोपली वाऱ्याने उलटली तर पाण्यात पडेल. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा काही तासांतच मृत्यू होईल!

पण ईश्वरी लीला वेगळीच होती. गीतकार म्हणतात की, ‘जो विश्वनिर्माता भूतलावरचे कोणताही खांब नसलेले, निळ्या आकाशाचे छप्पर अधांतरी तरंगत ठेवतो’ तो काहीही करू शकतो. आईने जन्मत:च त्याग केलेल्या कर्णरूपी तान्हे बाळ घेऊन गंगेच्या वेगवान प्रवाहात वाहत निघालेली ती टोपली ‘अधिरथ’ नावाच्या सम्राट धृतराष्ट्राच्या सारथ्याला सापडते. त्याची पत्नी राधिका आणि तो त्या निराधार बाळाचा पित्याप्रमाणे सांभाळ करतो, हा योगायोग नसतो, ती ईश्वरी योजनाच असते. त्यामुळे गंगेच्या अनेक भवरे असलेल्या वेगवान पाण्यात ज्या अगतिक बाळाचा फक्त मृत्यूच शक्य होता, तो पुढे महाभारतातला एक नामांकित राजा, एक अजेय योद्धा बनून अजरामर झाला!

‘बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी राधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणूनी त्याचे नाव अमर आहे.’

मधुकर जोशींनी घेतलेले दुसरे उदाहरण तर अजूनच प्रभावी आहे. परमेश्वराची भक्ती करतो म्हणून प्रल्हादाला त्याच्या राक्षस असलेल्या पित्याने ठार मारायचे ठरवले. त्यावेळी देवाने हिरण्यकश्यपूला मिळालेला विचित्र वर लक्षात घेऊन नृसिंहरूप धारण करून, स्वत:च त्याचा वध केला आणि प्रल्हादाचे प्राण वाचवले!

“भक्त बाळ प्रल्हादाला छळिले पित्याने
नारसिंहे रूपे त्याले रक्षिले प्रभुने
अलौकिक त्याची मूर्ती अजून विश्व पाहे.”

दोन प्राचीन उदाहरणे घेतल्यावर, मधुकरजींनी तिसरे उदाहरण थोडे अलीकडचे घेतले. संत कबीर हे एक गरीब वीणकर होते. त्यांना लोक चिडवत, त्यांची टिंगल करत. त्यावेळी ज्या वेदना ते सहन करत, त्यातूनच त्यांचे लेखन होई. त्यांनी अनेक दोहे लिहिले. त्यांनाही देवानेच वाचवले, इतकेच नाही तर समाजातल्या अगदी खालच्या स्तरात जीवन व्यक्तीत केलेल्या, त्या माणसाला संतपद प्राप्त झाले. आता लोक त्यांचे दोहे मोठ्या भक्तीने गातात. कबीराने अश्रू गाळत ज्या ओळी लिहिल्या त्याच पुढे मोठे भक्तिकाव्य ठरल्या, हेसुद्धा ईश्वरी कृपेनेच घडले असे गीतकार म्हणतात.

‘साधुसंत कबीराला त्या छळिती लोक सारे,
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे,
आसवेच त्यांची झाली दु:खरूप दोहे.’

आता सगळे बदलले! टेलिव्हिजनमध्ये श्रवणाबरोबर दृश्यही दिसतात म्हणून त्याचा मोठा प्रभाव पडला आहे. माणसाची दोन ज्ञानेंद्रिये गुंतवून ठेवणारे हे माध्यम ज्ञान मात्र किती आणि कोणते देते हा प्रश्नच आहे. कारण आकाशवाणी ऐकत लोक आपली सकाळची कामे करू शकत. मधुर संगीत आणि सुंदर कविता यांमुळे कलेचा आणि उच्च जीवनमूल्यांचा एक संस्कार सगळ्या समाजावर नकळत होऊन जायचा. आज आपण ज्या टीव्ही मालिका पाहतो, त्यात तर प्रत्येक घर हे आपसातल्या कारस्थानांचे केंद्र बनलेले पाहतो. मत्सर, द्वेष, राग, गुन्हेगारी, खोटेपणा, बाहेरख्यालीपणा याची रेलचेल जणू प्रत्येक कुटुंबात पसरली आहे, असे खोटेच चित्र उभे केले जाते.

काही अभ्यासकांच्या मते, पाश्चिमात्य जगातील मोठमोठ्या कॉर्पोरेट्सना भारतातील भक्कम कुटुंबसंस्था हा अडथळा वाटू लागली आहे. ती आधी खिळखिळी आणि हळूहळू नष्ट करण्यासाठीच परस्परविश्वास, टिकाऊ नातेसंबंध, नैतिक मूल्ये हे सर्व नष्ट करणारे साहित्य मुद्दाम पुरस्कृत करण्यात येते आहे. खरे-खोटे देवालाच माहीत. पण तो जुना सुसंकृत, निकोप, सकारात्मक मनोरंजनाचा काळ संपला हे मात्र खरे!

Recent Posts

Savings: बचत खात्यावर कसे मिळणार FDचे रिटर्न?

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमावलेल्या पैशातून काही ना काही रक्कम वाचवत असतो. थोड्या थोड्या पैशातूनच बचतीची…

56 mins ago

IPL 2024: कोहलीच्या जोरावर RCB प्लेऑफसच्या शर्यतीत, जाणून घ्या संपूर्ण गणित

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एका वेळेसाठी पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या १०व्या स्थानावर होते. त्यावेळी…

2 hours ago

Loksabha Election 2024: पंतप्रधान मोदींचा आज जोरदार प्रचार, तेलंगणाा आणि ओडिशामध्ये सभा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४च्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार जोरात सुरू आहे. देशभरात सोमवारी म्हणजेच…

3 hours ago

Akshaya Tritiya 2024: आज आहे अक्षय्य तृतीया, जाणून घ्या खरेदीचा शुभ मुहूर्त

मुंबई: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला म्हणजेच १० मे २०२४ला अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) सण…

4 hours ago

RCB vs PBKS: बंगळुरुचा ‘विराट’ विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ…

RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…

11 hours ago

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे १७ मे रोजी एकाच मंचावर

महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…

12 hours ago