विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर सडकून टीका केली. महत्त्वाचं म्हणजे सभागृहात एक कागद दाखवून ठाकरे गटाकडून ५० कोटींसाठी पत्र आल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतांना म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये शासन आपल्या दारी सुरु आहे, मागच्या सरकारमध्ये शासन आपल्या घरी होतं. मागच्या सरकारमध्ये सगळा दर्जा घसरला होता. शिक्षणाचा, गुंतवणुकीचा , विकासांचा दर्जा घसरला. असं असलं तरी टोमण्यांचा दर्जा वाढला होता. आम्ही तुम्हांला दोष देणारे नाहीत तर ठोस काम करणारे आहोत. शैक्षणिक विकासकामांबाबत सरकारने खंबीरपणे पावलं उचलली आहेत. गणवेशासोबत शूज देण्याचा निर्णय घेतला असून शिक्षकांची ३० हजार पदं पुढील दोन महिन्यात भरणार आहोत. तसेच साखर उद्योगाकरीता शासन पावलं उचलत आहे. उद्योगांसाठी वीज दर कमी केला असून १२०० कोटी रुपयांची सबसीडी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
”आमच्यावर गद्दारीचे आणि खोक्यांचे आरोप केले जात आहे. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे, हेसुद्ध बघितलं पाहिजे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, मतदारांशी गद्दारी केली, २५ वर्षांच्या मित्राशी गद्दारी केली, शिवसैनिकांशी गद्दारी केली ते आम्हांला गद्दार म्हणत आहेत. उलट आम्ही तर ज्यांच्यासोबत निवडून आलो त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आहे. आमच्याकडे खूप गोष्टी आहेत, बोलता येतील.” ५० खोके-५० खोके तुम्ही करतात. आणि शिवसेनेच्या खात्यातले ५० कोटी रुपये तात्काळ आमच्या खात्यात वर्ग करा, असं पत्र मला पाठवतात. आम्हांला गद्दार म्हणायचं, खोके म्हणायचं अन् ५० कोटींसाठी पत्र पाठवायचं.आता खरी शिवसेना कुणाकडे आहे, आपल्याकडे. तरीही मी त्यांचे पैसे देऊन टाका म्हटलं. आम्हांला काहीही नको, केवळ बाळासाहेबांचे विचार पाहिजेत आणि त्यांना पैशांचं पडलंय. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर आरोप केले.