पंढरपूरच्या वारी पालखी मार्गाचे केले ऑनलाइन भूमिपूजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘मी विठ्ठलाला आणि वारकऱ्यांना नमन करतो. देशावर कितीही संकटे आली तरी भगवान विठ्ठलाची दिंडी अखंडपणे कायम सुरू राहिली. पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात प्राचीन जनयात्रा म्हणून ओळखली जाते. पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका आणखी उंचावर नेणारे ठरतील’, असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला. ते पंढरपूर पालखी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. तसेच, वारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे पंढरीच्या वारीत महिलाही सोबत असतात. स्त्री-पुरुष समानता ही वारीत पाळली जाते. वारी ही समानतेचे प्रतीक आहे. वारकऱ्यांच्या या वारीने एक सामाजिक आंदोलनाची भूमी तयार केली. संत सावतामाळी, कान्होपात्रा, अशा विविध समाजघटकातील संतांचा त्यात समावेश होता. वारी ही राष्ट्रसेवा, राष्ट्रभक्तीचे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
मोदींनी ‘राम कृष्णहरी, राम कृष्णहरी… म्हणत कार्यक्रमाची सुरुवात केली. या वेळी त्यांनी संत तुकाराम यांच्या अनेक अभंगांचा आणि ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील काही ओळींचा आधार भाषणात घेतला. ‘मला आनंद होत आहे की, संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत आहे. वारकऱ्यांना सुविधा मिळणार आहेत. पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावतील’, असे मोदी म्हणाले.
‘सबका साथ, सबका विकास’, ही संकल्पना भगवान विठ्ठलापासून मिळणाऱ्या प्रेरणेतून निर्माण झाली आहे. माझे पंढरपूरशी विशेष नाते आहे. भगवान द्वारकाधीश इथे येऊन विठ्ठल रूपात विराजमान झाले. दुसरे नाते म्हणजे माझे काशीशी नाते आहे आणि पंढरपूर हे आमच्यासाठी दक्षिण काशी आहे,’ असे मोदी म्हणाले. ‘या भूमीने संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत तुकारामांसारखे संत आणि नवीन ऊर्जा दिली. विठूमाऊलीच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटते, असे मोदी म्हणाले.
पंढरपूर वारी पालखी मार्गाचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते झाला. या वेळी मोदी यांनी महाराष्ट्रातील वारी परंपरेचे भरभरून कौतुक केले. तसेच, हा पालखीमार्ग वारीसाठी कसा आणि किती फायद्याचा ठरेल याबाबतही सांगितले. दरम्यान, पालखी मार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर सावली देणारे डेरेदार वृक्षारोपण करा, असे अावाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. पंढरपूर वारी पालखी मार्गाचा शुभारंभ ऑनलाइन पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. या कार्यक्रमसाठी पंढरपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री कपिल पाटील, रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग यांचे भूमिपूजन झाले. यावेळी मोदी यांनी अभंगाचा दाखला देत वारकरी परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. या पालखी मार्गामुळे विठ्ठल भक्तांना सुविधा उपलब्ध होतील. त्याशिवाय स्थानिक विभागाच्या विकासात हे मार्ग मोलाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. विठ्ठलानेच आपली भेट घडवली असल्याचे म्हणत मोदींनी उपस्थित जनसमुदायाला भावनिक साद घातली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, देश शेकडो वर्षांच्या गुलामीत अडकला होता. नैसर्गिक संकटे आली, अनेक आव्हानात्मक परिस्थिती आली. मात्र, विठ्ठलाच्या भक्तीत खंड पडला नाही. वारी ही जगातील सर्वात जुनी आणि मोठ्या जनयात्रेच्या स्वरुपात आहे. वारी ही जनआंदोलनाच्या स्वरुपात पाहिली जाते. पालखी यात्रेचे मार्ग वेगवेगळे असले तरी एकाच ठिकाणी त्या दाखल होतात. भारताच्या त्या शाश्वस्त शिक्षणाचे हे प्रतिक असून आपल्या आस्थेला एका ठिकाणी बांधत नाहीत, तर त्यांना मुक्त करतात. आपले मार्ग वेगवेगळे असू शकतात. विचार वेगवेगळे असू असतात. मात्र, त्याचे लक्ष्य एक आहे. शेवटी सर्व पंथ हे ‘भागवत पंथ’ आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रत्येक पावलावर केंद्रासोबत…
‘भक्तिमार्गावरून आजवर आपल्या देशाची वाटचाल झाली आहे. ही वाटचाल आणखी सहज व्हावी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नितीन गडकरी यांना धन्यवाद देतो. लाखो वारकऱ्यांचे चरणस्पर्श होणारे हे रस्ते आहेत. वारीला जाता आले नाही तरी वारी करून आलेल्या वारकऱ्यांच्या पाया पडून आपण दर्शन घेतो. ही आपली परंपरा आणि आपली संस्कृती आहे. वारीने समाजाला दिशा, संस्कृती आणि संस्कार दिले. या पालखी मार्गाच्या कामास विठू माऊलीचेही आशीर्वावाद मिळतील. या कामासाठी महाराष्ट्र प्रत्येक पावलावर केंद्र शासनासोबत असेल हे मी वचन देऊ इच्छितो’, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.