खार्तूम (वृत्तसंस्था): सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेथे राहणाऱ्या भारतीयांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
“गोळीबार आणि चकमकी लक्षात घेता, सर्व भारतीयांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे, घरामध्येच रहा आणि बाहेर जाणे थांबवा. कृपया शांत राहा. पुढील अपडेट्सची प्रतीक्षा करा,” असे खार्तूममधील भारतीय दूतावासाने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, सध्या राजधानी खार्तूमसह सुदानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सुदानच्या निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेसने अध्यक्षांचा राजवाडा, सुदानचे लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह अल-बुरहान यांचे निवासस्थान आणि खार्तूमचे आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांच्या तळावर हल्ला करणाऱ्यांना अटक केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, खार्तूम विमानतळावरील सर्व उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत. २०२१ मध्ये जनरल अब्देल-फतेह बुरहान यांच्या नेतृत्वाखालील लष्करी बंडानंतरच सुदानमध्ये अराजकतेची स्थिती आहे.