Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीDiwali faral : खमंग आणि खुसखुशीत दिवाळी फराळासाठी वापरा 'या' खास टिप्स...

Diwali faral : खमंग आणि खुसखुशीत दिवाळी फराळासाठी वापरा ‘या’ खास टिप्स…

दिवाळी सण (Diwali Festival) अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरांत साफसफाई झाली असून आता खमंग फराळाचा सुवासही दरवळायला सुरुवात झाली आहे. मात्र, हल्ली कामावरुन सुट्टी मिळत नसल्याने अनेकांचा फराळ बनवायचा बाकी राहिला आहे. शिवाय घाईघाईत फराळ बनवायला घेतला तर तो फसतो. कधी चकल्याच नीट पडत नाहीत, तर कधी लाडू इतका टणक होतो की चावताना दाताचा तुकडा पडेल की काय असं वाटतं. पण चिंता करु नका, अगदी खमंग, खुसखुशीत आणि झटपट फराळ बनवायचा असेल, तर या लेखात दिलेल्या काही सोप्या टिप्स (Kitchen Tips) वापरुन पाहा. ज्यामुळे तुम्हाला फराळ विकत आणावा लागणार नाही आणि तो घरी बनवल्याचं समाधानही मिळेल.

१. चकली (Chakali)

पाहुण्यांच्या पुढ्यात फराळाचं ताट आणून ठेवलं की सगळ्यांत पहिला तुकडा तोडला जातो तो चकलीचा. पण हीच चकली बनवताना मात्र नाकी नऊ येतात. कधीकधी पीठच व्यवस्थित मळलं जात नाही आणि त्यामुळे पुढील सगळीच कृती फसते. अशावेळी चकली भाजणीचं पीठ थोडंथोडं गरम पाणी घालून मळावं. यामुळे पीठात गुठळ्या होत नाहीत आणि ते छान मऊ मळलं जातं. शिवाय चकल्या पाडतानाही त्यांचे तुकडे पडत नाहीत.

चकल्या तळताना मंद गॅसवर तळाव्या म्हणजे कुरकुरीत होतील. गॅस मोठा ठेवल्यास त्या तेल शोषून घेतात व थोड्या वेळाने मऊ पडतात. चकली तळताना गॅस अधूनमधून कमी-जास्त करावा, कारण तळताना तेल थंड झाले तर चकली विरघळून तुटेल व तेलही जास्त ओढून घेईल.

२. बेसनाचे लाडू (Besan Ladoos)

बेसनाचे लाडू खाताना बर्‍याचदा बेसनाचा उग्र वास जाणवतो. बेसन नीट भाजले न गेल्यामुळे तो कच्च्या बेसनाचा वास असतो. लाडू बनवताना बेसन नीट भाजणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी बेसन भाजत असताना एकाच वेळी तूप घालू नये. हळूहळू त्यात तुपाचा एकेक चमचा ओतावा. बेसनाला छान तपकिरी रंग आला आणि सुगंध सुटला की गॅस बंद करावा. खरपूस भाजलेल्या बेसनाचे लाडू अत्यंत चविष्ट लागतात.

लाडूसाठी डाळीचे पीठ दळताना अगदी थोडेसे जाडसर असावे. जर बारीक पीठ असेल तर लाडू चिकट बनतात व खाताना तोंडात चिकटतात. अशा वेळी बारीक रवा भाजून त्यात घातल्याने लाडू छान रवाळ बनतात.

३. करंजी (Karanji)

करंजी तेलात तळताना कधीकधी फुटते. ती फुटू नये याकरता दोन चमचे मैदा आणि थोडं पाणी घालून पातळ पेस्ट तयार करावी. ती पेस्ट करंजी बंद करताना कडेने व्यवस्थित लावून करंजी बंद करावी, म्हणजे ती नीट चिकटेल आणि तेलात फुटणार नाही.

करंजीचे पीठ भिजवताना थोडे तूप किंवा तेल गरम करून घातले म्हणजे करंज्या खुसखुशीत होतात. करंज्या तळताना गॅस मंद ठेवावा म्हणजे करंज्या खुसखुशीत होतील. गॅस मोठा ठेवल्यास करंज्या बाहेरून लाल होतात व थंड झाल्यावर मऊ पडतात.

करंज्यांच्या पुरणात घालायचं सुकं खोबरं थोडं भाजून घ्यावं म्हणजे खूप दिवस झाले तरी करंज्या खराब होत नाहीत, अन्यथा न भाजलेल्या खोबर्‍यामुळे काही दिवसांनी करंज्यांची चव खवट लागते.

४. पोह्यांचा चिवडा (Pohe Chivada)

कच्च्या पोह्याचा चिवडा करण्यापूर्वी पोहे थोडे थोडे ओव्हनमध्ये घालून गरम करून घेतले म्हणजे कुरकुरीत होतात व चिवडाही चांगला होतो. तळलेल्या पोह्याचा चिवडा करण्यापूर्वी तेल चांगले तापल्यावर गाळणीत थोडे पोहे घालून तळावेत म्हणजे पोहे चटकन फुलतात व तेलकटही होत नाहीत. पोहे तळताना गॅस मंद असल्यास पोहे चांगले फुलत नाहीत व तेलही ओढून घेतात, त्यामुळे चिवडा तेलकट होतो.

५. शंकरपाळी (Shankarpali)

आपण तेल, पाणी व साखर मिश्रण गरम करून शंकरपाळी बनवतो तेव्हा मिश्रण गरम असताना मैदा मिक्स करू नये त्यामुळे शंकरपाळी तळताना तेल किंवा तूप जास्त शोषले जाते व शंकरपाळी तेलकट होते. शंकरपाळी बनवताना गोळा घेऊन थोडे जाडसर लाटावे म्हणजे त्या छान होतात. पातळ लाटलेल्या शंकरपाळ्या तळल्यानंतर कडक होतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -