केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अजित पवारांना इशारा
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवार यांना दम देत माझ्या नादाला लागू नका, थेट पुण्यात येऊन बारा वाजवीन, अशा शब्दात इशारा दिला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील चिंचवडमध्ये बोलताना राणेंवर बोचरी टीका केली होती. पवारांच्या या टीकेला मंत्री राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. कोल्हापूर दौऱ्यावर आले असता आज, शनिवारी त्यांनी अजित पवारांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, बारामतीच्या बाहेर जाऊन बारसे घालायचे बंद करा. अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहीत नाही. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरूनही त्यांनी टोला लगावला. नामांतरावरून सगळेच श्रेय घ्यायला येतील. मी केलं, मी केलं, काय केलं तू? मराठी भाषेतील विशेषणं कुठेही वापरतो, असे ते म्हणाले. कोणता पक्ष संपायला मी काही जोतिषी नाही, जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला, उद्धव ठाकरे यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिलं आहे? कुठलंही अस्तित्व नाही, काही नाही. पक्षातून गेलेले लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, अडीच वर्षात आपण काय केले ते पहा म्हणावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वांद्रे पोटनिवडणुकीत २०१५ मध्ये काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांचा शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी पराभव केला होता. त्यामुळे बाईने पाडले असे म्हणत चिंचवडमध्ये बोलताना अजित पवार यांनी मंत्री नारायण राणेंना डिवचले होते.