बेनॉनी: वर्ल्डकप जिंकण्याचे टीम इंडियाचे(team india) स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहिले. ऑस्ट्रेलियाने अंडर १९ वर्ल्डकप २०२४च्या(U19 World cup 2024) अंतिम सामन्यात भारताला ७९ धावांनी हरवले. संपूर्ण विश्वचषकात अजेय राहिलेल्या भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. भारताच्या पुरुष संघालाही वर्ल्डकप २०२३मध्येही ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात पराभव सहन करावा लागला होता.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५३ धावा केल्या होत्या. खरंतर हे आव्हान तितकेसे काही मोठे नव्हते. मात्र भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियासमोर साफ शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ १७४ धावांवर बाद झाला.
भारताकडून सलामीवीर आदर्श सिंगने ४७ धावांची खेळी केली तर मुरूगन अभिषेकने ४२ धावांची खेळी केली. मुशीर खानला २२ धावा करता आल्या. त्या व्यतिरिक्त इतर सर्व फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळेच भारताला पराभव सहन करावा लागला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगने सर्वाधिक ५५ धावा केल्या होत्या. हॅरी डिक्सॉनने ४२ धावा केल्या. तर ह्युह वेबगेनने ४८ धावा ठोकल्या. ऑलिव्हर पीकने नाबाद ४६ धावा केल्या.