सोलापूर (हिं.स.) : शहरात पाचशेहून अधिक शाळा व महाविद्यालये आहेत. स्कूल बस परवडत नसल्याने अनेक पालक त्यांच्या मुलांना रिक्षातून शाळेत पाठवतात. रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी शाळकरी मुलांची वाहतूक करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई किंवा रिक्षा जप्त होईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिला आहे.
शहरातील नामांकित शाळांचे शैक्षणिक शुल्क परवडत नाहीत, तसेच स्कूल बसचे भाडेही परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील पालकांची मुले दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात. परवडेल अशा दरात त्यांच्या परिसरातील रिक्षांतून आपल्या मुलांना शाळेत पाठवितात.
पण, रिक्षांमध्ये सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतात. तर दुसरीकडे, एकाच रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट मुलांची वाहतूक केली जाते. त्यामुळे आता रिक्षांतून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होऊ नये याकडे आरटीओचे विशेष लक्ष असणार आहे. तसेच शाळांनाही त्याबाबत आता खबरदारी घ्यावी लागणार आहे.