नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे मालवाहतुकीवर मर्यादा आल्या होत्या. त्यातून सावरत असतानाच डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. परिणामत: मालवाहतूक करणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर आज, सोमवारपासून मालवाहकतुकीसाठी आकारण्यात येणाऱ्या भाड्यात २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याच्या थेट परिणामांमुळे दैनंदिन वस्तू महागणार आहेत.
याबाबत अधिक सांगताना नागपूर ट्रकर्स युनिटीचे प्रमुख कुक्कू मारवाह म्हणाले, ‘डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परिणामत: २५ टक्क्यांनी भाडे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजघडीला शहरात पाच ते सहा हजार ट्रान्स्पोर्टर्स आहेत. त्या सर्वांचा भाडेवाढीला पाठिंबा आहे. याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली आहे.
नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने चारही दिशांना मालवाहतूक होते. यामध्ये प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, भोपाळ, इंदूरसह इतरही लहान-मोठी शहरे नागपूरशी जुळलेली आहेत. सध्या नागपूरहून होणाऱ्या दळणवळणाचा विचार करता आंबे, मोसंबी, मिरची, फुलकोबी, कोळसा, लोखंड, लाकूड या उत्पादनांची अधिक प्रमाणात ये-जा होत आहे. मालवाहतुकीचा खर्च वाढल्यास या सर्वांचे दरदेखील वाढणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या कारणांमुळे सुरू असलेल्या अस्थिरतेचा मागील पाच वर्षांपासून सामना करणाऱ्या ट्रान्स्पोर्ट क्षेत्राला कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. मागील सत्तर वर्षांपासून ट्रान्स्पोर्टिंगच्या व्यवसायात नागपूरचे स्थान महत्त्वपूर्ण राहिले आहे. बदलत्या काळात मंदावलेली ट्रकची मागणी आणि सातत्याने असलेल्या अस्थिरतेमुळे वाढणारे इंधनाचे दर, याचा दुष्परिणाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.