नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशासह अवघ्या विश्वाचे लक्ष अयोध्येकडे लागलेले आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या अयोध्येमध्ये सुरू आहे. मंदिर परिसरामध्ये चार वेदांच्या सर्व शाखांचे पारायण आणि यज्ञ सातत्याने सुरू आहेत. हे अनुष्ठान मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापर्यंत चालणार आहे. दरम्यान, राम मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पहिल्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे, अशी महत्त्वाची माहिती राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.
अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे हा सोहळा कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता राम मंदिराचा संपूर्ण मॅपच समोर आला आहे. चंपत राय यांनी सांगितले की, ७० एकरमध्ये पसरलेल्या भूभागाच्या उत्तर भागात मंदिराचे बांधकाम झाले आहे. हा भाग काहीसा अरुंद आहे. त्यामुळे या जागेवर तीन मजली मंदिर उभे राहत आहे. मे २०२२ पासून मंदिराच्या मुख्य भागाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. राजस्थानमधील बंसी पहाडपूर येथील गुलाबी सँडस्टोनचा वापर मंदिराच्या बांधकामामध्ये करण्यात आला आहे. तसेच फ्लोअरसाठी मकराना मार्बल आणि गर्भगृहासाठी श्वेत मार्बलचा वापर करण्यात आला आहे.
मंदिराच्या खालील भाग हा भरीव आहे. मंदिर आणि तटबंदीचे आयुर्मान हे एक हजार वर्षांचे असेल. त्याच्या बांधकामासाठी २२ लाख क्युबिक दगड वापरले आहेत.
चंपत राय यांनी पुढे सांगितले की, पुढच्या ७-८ महिन्यांमध्ये आणखी ७ मंदिरे बांधली जाणार आहेत. त्यामध्ये महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषाद राज, शबरी आणि अहिल्या यांच्या मंदिरांचा समावेश आहे. त्याशिवाय मंदिर परिसरामध्ये जटायूची स्थापना करण्यात आली आहे.
चंपत राय म्हणाले की, “तीर्थक्षेत्र सुविधा केंद्रामध्ये २५ हजार यात्रेकरूंसाठी लॉकरची सुविधा करण्यात आली आहे. पीएफसीजवळ एक छोटे रुग्णालयही बांधले जाणार आहे. यात्रेकरूंसाठी शौचालय आणि इतर सुविधांसाठी एक मोठे कॉम्प्लेक्सही बांधण्यात आले आहे. या संकुलातून बाहेर पडणारा कच-यासाठी या ठिकाणी दोन गटार प्रक्रिया प्रकल्पही उभारले जाणार आहेत.
‘जर आपल्याला पाण्याची गरज भासली तर शरयू नदीतून घेतलं जाईल. २० एकर जागेवर बांधकाम सुरू आहे. तर, ५० एकर जागेवर हिरवळ पसरली आहे. ही झाडे शंभर वर्षे जुनी आहेत. अशी घनदाट जंगले आहेत जिथे सूर्यकिरण जमिनीवर पोहचत नाहीत. त्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी कधीही खाली जाणार नाही. तसेच येथील पावसाचे पाणी देखिल शरयूमध्ये जाणार नाही, आम्ही झिरो डिस्चार्ज पॉलिसीवर काम करत आहोत’, असेही ते म्हणाले.