Sunday, May 19, 2024
Homeदेशनाव महाराजांचे घेतील, पण काम मुघलांचे करतील

नाव महाराजांचे घेतील, पण काम मुघलांचे करतील

फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

सिल्वासा (वृत्तसंस्था) : देशात अनेकविध निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला असून, शिवसेनेचा इतिहास पाहा, ते तिथे आहेत, तेच बरे आहे, असा टोला लगावला आहे.

शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनाच मैदानात उतरवण्यात आले आहे, तर भाजपकडून महेश गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक सभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचे राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर ५६ जागा मिळाल्या आणि ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, अशी टीका फडणवीस यांनी केली.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? अशी विचारणा करत, ते इथे आले तर नाव महाराजांचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

वानखेडेंवरील आरोपांवरूनही टीका!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आधी आर्यन खानची अटक आणि नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप या मुद्द्यावरून फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. नवाब मलिक सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. अशा प्रकारे तपास अधिकाऱ्याला टार्गेट करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -