साईसंस्थान प्रसादालयातील आचाऱ्यांना दिले निमंत्रण
शिर्डी (प्रतिनिधी): देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना श्री साईबाबांच्या प्रसादालयातील मराठमोळ्या जेवणाची भुरळ पडल्याने त्यांनी साईबाबा संस्थानच्या प्रसादालयालयातील आचाऱ्यांना राष्ट्रपती भवनात एक महिन्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
७ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शिर्डी दौरा पार पडला. साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेऊन त्यांनी साईबाबा संस्थानच्या प्रसादालयातील बाबांचा भोजन प्रसाद घेतला. यावेळी त्यांच्यासाठी खास मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रीय खाद्य संस्कृती असलेल्या पदार्थांमध्ये साधी डाळ, बटाटावडा, मेथीची भाजी, शेंगदाणे चटणी, मटकीची उसळ, शिरा, चपाती आदींचा समावेश होता. राष्ट्रपती महोदयांची व त्यांच्याबरोबर असलेल्या इतर महत्त्वाच्या व्यक्ती यांचे जेवण बनवण्याची जबाबदारी प्रसादालय विभागाचे आचारी रविंद्र वहाडणे तसेच प्रल्हाद कर्डीले यांच्यावर सोपवण्यात आली होती.
राष्ट्रपतींना बनवलेले पदार्थ आवडल्याने त्या दिल्लीला जाताच त्यांनी श्री साईबाबा संस्थानला पत्र पाठवून आचारी रविंद्र वहाडणे व कर्डीले यांना राष्ट्रपती भवनात निमंत्रित केले आहे. उद्या २९ जुलैला सकाळी यांना दिल्लीला पाठवण्यात येणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
आचारी रविंद्र वहाडणे हे शिर्डीजवळ न.पा.वाडी येथील रहिवासी आहे तर प्रल्हाद कर्डीले हा श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगांव येथील रहिवासी आहेत. याबाबत साईप्रसादालयाचे खातेप्रमुख विष्णू थोरात यांनी बोलतांना सांगितले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी साईप्रसादालयात प्रसाद घेतल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांना थेट राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले हि साई संस्थानच्या इतिहासात महत्वपूर्ण बाब आहे.
साईबाबा संस्थानच्या प्रसादालयातील आचा-यांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले हि शिर्डी ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब आहे.
🌹 ओम साई जय साई 🌹