नवी दिल्ली (वृत्तसंस्था): देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात ६ हजार ०५० नवीन रुग्ण आढळले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडाही २८ हजार ३०३ वर पोहोचला आहे. गेल्या सात दिवसांमधल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाच्या वाढणाऱ्या रुग्णांमध्ये केरळनंतर महाराष्ट्र दूसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत ९२६ कोव्हिड रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ४८७ रुग्ण इतकी आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा एप्रिलच्या ६ दिवसांच्या तुलनेत मार्चच्या ३१ दिवसांपेक्षा जास्त आहे. संपूर्ण मार्च दरम्यान कोरोनाचे ३१ हजार ९०२ नवीन रुग्ण आढळले. तर एप्रिलच्या केवळ ५ दिवसांतच २० हजार २७३ नवीन रुग्ण आढळले आहेत.
सरासरी पाहिल्यास मार्चमध्ये दररोज सरासरी १ हजार नवीन केसेस आढळून आल्या, तर एप्रिलमध्ये दररोज सरासरी ४ हजार केसेस समोर येत आहेत. संसर्गाचा दर असाच राहिला तर एप्रिलमध्ये १.२० लाख नवीन रुग्णांची शक्यता आहे.