Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमुलांसाठी कुटुंबात समतोल राखण्याची गरज

मुलांसाठी कुटुंबात समतोल राखण्याची गरज

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

एकत्र कुटुंबात मुलांची जास्त घुसमट होते, असे देखील काही ठिकाणी निदर्शनास येते. घरातील ठरावीक सदस्यांचे आपसात असलेले वादंग, हेवे-दावे, मत्सर, कलह, अबोला यात मुलांनी पण सहभागी व्हावे, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आपली मतं मुलांवर लादणे, आपण ज्यांना वाईट म्हणतो त्यांना मुलांनी पण वाईटच म्हटले पाहिजे, अशी जबरदस्ती मुलांवर करणे योग्य नाही.

लांना मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, संभाव्य धोके लक्षात आणून देणे आपले कर्तव्य आहे; पण मुलांनी आपल्या चुकीच्या प्रकरणांमध्ये आपलीच बाजू उचलून धरावी, आपण कितीही अयोग्य असलो तरी मुलांनी आपलंच अनुकरण करावं, घरात आपल्या चुकांमुळे घडणाऱ्या चुकीच्या प्रसंगात आपलीच साथ द्यावी, कारण आपण त्यांचे आई-बाप आहोत, ही अपेक्षा कितपत योग्य आहे?

मुलामध्ये निरपेक्ष विचार करण्याची सवय, भेदभाव न करण्याची सवय, माझं-तुझं, आम्ही-तुम्ही न करण्याची सवय आपणच जर त्यांच्या वाढत्या वयात लावली, तर नक्कीच त्यांची निकोप वाढ होऊ शकेल. अनेकदा मुलांकडून कोणतीही चूक झाली, तर पत्नीने पतीच्या किंवा पतीने पतीच्या खानदानाचा उद्धार करणे, एकमेकांच्या खानदानाला दोष देऊन मुलांना कमी लेखणे, मुलांसमोर घरातील, नात्यातील इतर सदस्यांबद्दल अपशब्द बोलणे अत्यंत चुकीचे आहे. मुलांच्या मनात कोणाविषयी विष पेरणे, त्यांची मनं कलुषित करणे, त्यांच्यासमोर सातत्याने नकारात्मक विषयावर बोलणे, सावधपणा शिकविण्यापेक्षा त्यांच्या मनात भीती तयार करणे, त्यांच्यात सूडबुद्धी रुजवणे, यामुळे मुलं देखील तसाच विचार करू लागतात आणि त्यांच्या पुढील भविष्यावर, पुढील आयुष्यावर याचा कळत-नकळत परिणाम होत जातो.

कदाचित, पती-पत्नीमधील वाद, गैरसमज तात्पुरत्या स्वरूपाचे असू शकतात. शाब्दिक चकमकीनंतर ते परस्परांशी पुनःश्च व्यवस्थित वागायला लागतात, पण मुलांनी हे सर्व लक्षात ठेवलेले असू शकते. ज्या वेळी पती-पत्नी मुलांसमोर एकमेकांना कायदेशीर प्रक्रियेची धमकी देणे, मुलांना धमकावणे, दम देणे, त्यांच्यावर दबाव टाकणे, अथवा तसा प्रयत्न करणे या कृती करतात, एकमेकांना सोडून द्यायची किंवा वेगळं होण्याची भाषा करतात, तेव्हा मुलांच्या मन:स्थितीचा विचार केला जात नाही.

घरातील अथवा ऑफिसमधील कुरबुरींचा राग मुलांवर काढणे, घरातील वडीलधाऱ्या माणसांचा मुलांसमोर अपमान करणे, पती-पत्नींनी भांडताना किंवा बोलताना असभ्य भाषा वापरणे, सातत्याने एकमेकांवर आरोप करत राहणे, आपल्या चुकांचे समर्थन करीत राहणे, आपल्या भांडणांमुळे अपत्यांकडे दुर्लक्ष करणे, आपल्या बिघडलेल्या मनःस्थितीचा परिणाम मुलांच्या संगोपनावर होऊ देणे, यामुळे मुलांच्या मनावर खूप विपरीत परिणाम होतात. त्यामुळे मुलं एकलकोंडी होणे, कुटुंबातील व्यक्तींशी संवाद-संपर्क-भेटीगाठी टाळणे, घरगुती सभारंभात सहभागी न होणे, स्वतःचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर अथवा घराबाहेर घालवणे, असे पर्याय घरातील कटकटीला वैतागून निवडतात.

एकदा मुला-मुलींचं लक्ष घरातून उडालं की, त्यांना बाहेरचं जग, मित्र-मैत्रिणी खूप चांगल्या वाटू लागतात. बाहेरील संपर्कात आलेली व्यक्ती आणि तिचा हेतू चांगला असेल, तर ठीक अन्यथा घरातील अतिरिक्त बंधन, हुकूमशाही मोडून काढण्याकरिता खोटं बोलणे, खोटं कारण सांगून घरातून कुठेही जाणे, व्यसन करणे, अपघात घडणे, आत्महत्या करणे, चुकीच्या व्यक्तीच्या आहारी जाऊन वाईट सवयी आत्मसात करणे, नको त्या वयात प्रेम प्रकरण करून त्यातून काहीतरी अघटित निर्णय घेणे, घराबाहेरील कोणत्याही बेकायदेशीर, अनैतिक कृत्यात फसणे असे प्रकार घडतात आणि मुलांचं आयुष्य बरबाद होऊन, घरातील व्यक्तींना पण प्रचंड मानसिक क्लेश सहन करावा लागतो. त्यामुळे कौटुंबिक अथवा पती-पत्नीतील वादविवाद आणि आपली आपत्य या सगळ्यांचा समतोल राखून परिस्थिती कशी सांभाळायची, याचा विचार प्रत्येक पती-पत्नीने करणे क्रमप्राप्त आहे.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -