आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप
मुंबई : उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांची हत्या हे उबाठा अंर्तगत चालू असलेला गँगवॉरचा परिणाम आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत हे जे गँगवॉर उबाठा अंतर्गत सुरू आहे, ते पहिले फक्त कपडे फाडेपर्यत होते. आता गोळी झाडेपर्यंत आलेला आहे, असा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी व्हिडीओ जारी करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमदार राणे म्हणाले की, अभिषेक घोसाळकर हे आमदार आदित्य ठाकरे गँगमधले आहेत. हल्लेखोर मॉरिस आणि संजय राऊत यांचे काय संबंध आहेत? यासाठी त्यांचे सीडीआर तपासावेत, अशी मागणी राणे यांनी केली.
ज्या पद्धतीने संजय राऊत हे तेजस ठाकरे यांना प्रमोट करत आहेत. त्यामुळे हे गँगवॉर अजून कठोर आणि टोकाचे होत चाललेले आहे. मॉरिस याचे उद्धव ठाकरे आणि राऊतसोबत काय संबंध आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, सीडीआर तपासले पाहिजेत. तसेच आदित्य आणि संजय राऊत यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे, अशी मागणीही राणे यांनी केली.
या गँगवॉरमुळे आता सर्व गोळ्या मारण्यापर्यत आलेले आहे. जो मॉरिस राहुल गांधी यांच्या मुंबईतल्या यात्रेच्या तयारीला लागलेला आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंचे तो सगळीकडे बॅनर लावायचा, असा मॉरिस आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्ती असलेल्या घोसाळकर यांना गोळी घालतो, असे राणे म्हणाले. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या नावावर खडी फोडण्याअगोदर उबाठा अंतर्गत सुरू असलेले गँगवार अगोदर थांबवा नाहीतर, हा उद्या मातोश्री पर्यंत पोहोचेल, असा सावधानीचा इशारा राणे यांनी दिला.
कुत्रा गाडीखाली आला तरी राजीनामा मागतील
घोसाळकर आणि मॉरिस काही वर्षे एकत्र काम करत होते. आपापसातील वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. माझ्यावर पूर्णपणे राजकीय आरोप आहेत. एखाद्या गाडी खाली एखादा श्वान आला तर ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असा टोला विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला. विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करतोय. पण या घटनेचे कुणी राजकारण करू नये, असा सल्लाही यावेळी फडणवीसांनी दिला.
ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉर
घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रकार जो विरोधक करत आहेत, तो अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा मी निषेध करतो. कारण ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केली आहे. या दोघांमध्ये मी नगरसेवक होणार की तू नगरसेवक होणार, हा वाद होता. यामधून हा प्रकार घडल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.