Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणवाळू उपशाचा गोरख धंदा

वाळू उपशाचा गोरख धंदा

रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरचा उपसाच नाही

अतिवृष्टीमध्ये पोलादपूर, महाडला, पुराचा धोका

 

पोलादपूर (प्रतिनिधी) : पोलादपूरजवळच्या रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरचा साठा तुडुंब भरलेला आहे. मात्र, अद्याप पूरनियंत्रण उपाय म्हणून बॅकवॉटरचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली नसून केवळ एका सांडव्यातून थोड्याशा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. महाड शहरातील पूरस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलादपूरजवळच्या या रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरचा तातडीने उपसा करण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. तर दुसरीकडे सावित्री नदी पात्रातून वाळू उपसा सुरू आहे. रानबाजिरे धरणाचा विसर्ग वेळीच न झाल्यास महाड तसेच पोलादपूरचा अतिवृष्टी काळात पुराचा धोका तीव्र स्वरूपाचा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाड शहर व परिसरातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत समितीच्या बैठकीमध्ये रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा पाणीसाठा पूर्णत: रिकामा असल्यास अतिवृष्टीकाळामध्ये बॅकवॉटरची धोक्याची पातळी भरून ओव्हरफ्लो होऊन महाडच्या दिशेने वाहणाऱ्या नदीपात्राचा प्रवाह कमी असेल, असे मत प्रतिनिधींने विविध बैठकांवेळी व्यक्त केले होते. या अनुषंगाने मे २०२२ पासून बॅकवॉटरचा साठा कमी करण्यास सुरुवात होऊन संपूर्ण बॅकवॉटरचा जलाशय रिकामा करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा बॅकवॉटरचासाठा पूर्णपणे तुडुंब भरलेला असून महाड येथील सावित्री नदीपात्रातील वाळुरूपी गाळ उपसा वेगाने होत आहे.

त्या तुलनेमध्ये रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरचा विसर्ग करण्याकडे सपशेल दूर्लक्ष झाले आहे. परिणामी, भर उन्हाळयामध्ये रानबाजिरेपासून पोलादपूर व त्यापुढील गावांमध्ये सावित्री नदीचे पात्र सर्वत्र कोरडे पडले असून नदीलगतच्या नागरिकांना कपडे धुणे भांडी घासण्यासारख्या कामांसाठीदेखील पुरेसे पाणी नदीपात्रामध्ये शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. या नदीपात्रामध्ये काही ठिकाणी वाळूरूपी गाळउपसा मोठया प्रमाणात सुरू असल्याने या कामात रानबाजिरे धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास अडथळा होण्याची शक्यता असल्याने यंदा जाणीवपूर्वक रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा साठा कमी करण्यास विलंब केला जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

महाडच्या १९८९, २००५ आणि २०२१ या वर्षीच्या महापुराबाबत चर्चां रंगल्या. गेल्या वर्षी पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धरणाच्या बॅकवॉटरचा पुर्णपणे उपसा करून सावित्री नदीच्या पात्राचे पाणी धरणात अधिकाधिक रोखून धरण्याचा प्रयत्न बव्हंशी यशस्वी झाला होता. रानबाजिरे या महाड एमआयडीसीसाठी बांधण्यात आले. हे धरण चिरेबंदी असून दगडी बांधकाम आणि सांडव्यांच्या भागास काँक्रीटचे अस्तरीकरण तर स्टेलिंग बेसिसच्या भागात सांडव्यांतून येणारे पाणी साठविण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात आलेले आहे.

या धरणाची लांबी ३२० मीटर्स आहे. तर सांडवा १२१. ८४ मीटर्स असून ८ सांडव्यांवरील दरवाजे १२ मीटर, उच्चालक मोटर क्षमता १० अश्वशक्ती आहे. धरणाची क्षमता ४० मे.टन आहे. पाणीसाठा ६१.५० मीटर तर मृतसाठा ३.६ दशलक्ष घनमीटर, वापरण्यायोग्य पाणीसाठा २६.३२ दशलक्ष घनमीटर, पूर्ण संचय पातळी ६१.५० मीटर आहे. सांडव्यांची पातळी ५५ मीटर आहे. धरणाची महत्तम उंची ३३. ६१५ मीटर असून पाणलोटक्षेत्र १९७. २५७ चौ.कि.मी इतके आहे.

विसर्ग करणे गरजेचे
गेल्या वर्षी झालेल्या ६१.५० मीटर पातळीवर २९.९५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्यापैकी २२ मिलीयन क्युसेक पाणीसाठा धरणाचे सहा सांडवे खुले केले असताना अस्तित्वात होता. या सहा सांडव्यासोबतच दोन सर्व्हिस गेटसदेखील उघडण्यात आल्याने साधारणपणे प्रतिसेकंद २५९४६ घनमीटर पाणीसाठयाचा
विसर्ग झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -