कुडूस : येथील एका प्रसिद्ध शीतपेयनिर्मिती कंपनीच्या प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्याने महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या आंदोलनाला यश आले आहे. कंपनी प्रशासन व ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांनी बुधवारपासून वाडा तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या झेंड्याखाली बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. ते आता मागे घेण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीच्या हद्दीत शीतपेय बनवणारी ही कंपनी असून या कंपनीत स्थानिक भुमिपूत्र कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. कंपनी प्रशासन व ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरू असून ठेकेदाराने कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरलेले नाहीत. या व इतर मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
अनंता मेणे, तुषार पाटील, अशोक पाटील, लक्ष्मण कामडी रमेश ठाकरे हे उपोषणाला बसले होते. मात्र तीन दिवस झाले तरी कंपनी प्रशासन त्यांची दखल घेतली नसल्याने त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारी काही कामगारांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला व कंपनी विरोधात घोषणा दिल्याने शुक्रवारी रात्री तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली.
वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, नायब तहसीलदार अनिल लहांगे, कामगार कार्यालयाचे दीपक बोडके, कंपनीचे व्यवस्थापक रुपेश परदेशी, लोखंडे, रंजन खिराडे, कंत्राटदार धनंजय चौधरी, नासिर सुसे, कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जितेश ऊर्फ बंटी पाटील, स्वाभिमान संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मेणे व कामगारांचे शिष्टमंडळ यांच्यात दीर्घकाळ चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. दरम्यान शनिवारी सकाळी कंपनी प्रशासनाने कामगारांच्या मागण्या मान्य केल्याचे जाहीर केल्याने उपोषण कर्त्यांनी उपोषण मागे घेतले आणि कामगारांनी विजयी जल्लोष साजरा केला.