Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीSwami Samartha : श्रीस्वामी समर्थांची तेजस्वी शिष्यपरंपरा

Swami Samartha : श्रीस्वामी समर्थांची तेजस्वी शिष्यपरंपरा

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

स्वामींच्या ३०० शिष्यांचे पुढे हजारो भक्त, शिष्य, अनुयायी निर्माण झाले.

अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी दत्तउपासना आणि दत्तसंप्रदायाचा प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यासाठी दत्तसंप्रदायाच्या प्रचार, प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य पुढे नेण्यासाठी महाराजांनी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे ३००हून अधिक तेजस्वी शिष्य तयार केले. सर्वच शिष्य बाळप्पा, चोळप्पा सारखे स्वामीभक्तच होते.“किल्ला बांधूनी रहावे समुद्रतीरी. एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही. जेथून आलात तेथेच जा!” असे सांगत महाराजांनी केवळ दृष्टी टाकून अनेकांना संकल्पदिशा दिली व गतजन्मीची अनेकांची पापे धुवून टाकून त्यांना मार्गाला लावले. पुढे हेच महाराजांचे तेजस्वी शिष्य बनले. प्रत्येक शिष्याला त्यांनी विविध ठिकाणी दत्तप्रसार/धर्मप्रसारास पाठवले. उदा. बाळाप्पा यांना अक्कलकोटच्या किल्ल्यावर पाठवले, तर त्यांच्या भक्त अनुयायांना, अधिकाऱ्यांना योग्य त्या विविध ठिकाणी पाठवले. ‘धार्मिक कार्य प्रसार करण्यासाठी किल्ला बांधूनी राहावे’ हे स्वामींचे आवडते वाक्य होते.

विधी विरहित स्वामींची ‘संकल्प दीक्षा’ शिष्यांचा सर्वांगीण उद्धार व्हावा या नुसत्या संकल्पालाच ‘संकल्प दीक्षा’ असे म्हणतात. स्वामी हे संकल्प दीक्षा देणारे या भूतलावावरील एकमेव अद्वितीय असे सद्गुरू होते. अन्य गुरूंप्रमाणे शिष्यांना दीक्षा देण्यासाठी त्यांनी कोणताही विधी केला नाही. अगदी सामान्य भक्ताला / सेवेकऱ्याला त्यांनी दीक्षा दिली आहे. एका अगदी सामान्य मुसलमान भक्ताला स्वामींनी ‘अवलिया’ बनविले होते. योगभ्रष्ट भक्त शिष्यांचा उद्धार करण्यात स्वामींचा हातखंडा होता.

स्वामींचे तेजस्वी शिष्य :

तीनशेहून अधिक तेजस्वी शिष्य निर्माण करणाऱ्या स्वामी समर्थांच्या निवडक शिष्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत., ठाकुरदास बुवा (ठाकुरद्वारा, मुंबई), आनंदभारती (ठाणे), गोपाळबुवा केळकर (चिपळूण), रांगोळी बुवा (मालवण), बिडकर महाराज (पुणे), •जांभेकर महाराज (दादर, मुंबई), •नाना महाराज रेकी (नगर), •देशपांडे (केज), •बावडेकर बुवा (बार्शी), शंकर महाराज (पुणे), बाळाप्पा (अक्कलकोट), •श्रीकृष्ण सरस्वती (कोल्हापूर), काका महाराज (पुणे), सिताराम महाराज (मंगळवेढे), नृसिंह सरस्वती (आळंदी), •हनुमंत कोटणीस (सांगली), •नारायण महाराज (धुळे), दादाबुवा (मुंबई), •बोटे स्वामी (कर्नाटक), •वामनबुवा वैद्य (बडोदे), •सिद्धनाथ महाराज (बेळगांवजवळ), मुसलमान जामदार (मैदी) इ. अनेक तेजस्वी शिष्य स्वामींनी निर्माण केले.

स्वामींच्या तेजस्वी शिष्यांची पुढील ठळक वैशिष्ट्ये होती

धगधगते वैराग्य, अपार गुरुभक्ती, लोकविलक्षण त्याग, खडतर तपश्चर्या, उज्ज्वल चारित्र्य, ज्वलंत निष्ठा, आदर्श जीवनपद्धती, निष्कलंक वागणूक इ.

तेजस्वी शिष्यांचे कार्य

स्वामींच्या या तेजस्वी शिष्य परिवाराने दत्तभक्ती आणि स्वार्मीच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मठांची स्थापना केली. या शिष्यांनी १८७८ ते १९२५ या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, जळगाव, मुंबई, पुणे, ठाणे, कोकण, उर्वरित महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक- बेळगाव, कारवार, गुजरात सुरत, बडोदा, मध्यप्रदेश अशा अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले. याच कालावधीत स्वार्मीच्या शिष्यांव्यतिरिक्त अनेक स्वामींप्रेमी सत्पुरुष, संत निर्माण झाले. ज्यांनी स्वामीभक्ती प्रसारासाठी विविध ठिकाणी जागृत मठ स्थापन केले.

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -