सीमा दाते
मुंबई : मुंबईत उंदरांचा प्रादुर्भाव वाढू नये आणि पावसाळ्यात उंदरांमुळे नागरीकांना आजार होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेकडून उंदीर मारण्याची मोहीम हाती घेतली जाते. गेल्या पाच वर्षांत पालिकेने १६ लाख ४५ हजार १९ उंदीर मारले आहेत. याबाबत माहिती पालिकेने दिली असून पालिकेच्या कीटकनाशक विभागाने ही कामगिरी केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिका उंदीर मारण्याची मोहीम हाती घेते. पावसाळा सुरू असलेल्या ४ महिन्यांत हे काम शक्य होत नसल्याने पावसाळ्यापूर्वी केले जाते. अनेकदा पावसाळ्यात पाणी साचते. या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. या पाण्यात प्राण्यांचे मलमूत्र मिसळलेले असते. एखाद्या व्यक्तीच्या पायावर जखम झाली असल्यास अशा व्यक्तीला लेप्टो स्पायरेसिसची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे लेप्टोचा प्रसार होऊ नये यासाठी पालिकेतर्फे उंदीर मारण्याची मोहीम राबवली जाते.
दरम्यान जानेवारी २०१८ ते मे २०२२ या ५ वर्षांच्या कालावधीत पालिकेच्या कीटकनाशक विभागाने १६ लाख ४५ हजार १९ उंदीर मारले आहेत. कीटकनाशक विभागाकडून ही कामे करण्यात येत असून उंदरांना मारण्यासाठी अॅल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकल्या जातात. पावसाळ्यात गोळ्यांचा वापर बंद असतो. तर एका उंदराला मारण्यासाठी २२ रुपये देण्यात येतात.
वर्ष – मारलेल्या उंदरांची संख्या
२०१८ – ४,७५,५९०
२०१९ – ४,७७,८८९
२०२० – १,९८,४५१
२०२१ – ३,२३,४९३
जानेवारी ते मे २०२२ – १,६९,५९६