Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीतो तर ठाकरेंचा मूर्खपणा

तो तर ठाकरेंचा मूर्खपणा

मुख्यमंत्रीपदासाठी पवारांचा हात धरला...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हल्लाबोल

सातारा (वृत्तसंस्था) : ‘ज्यांनी स्वत: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मूर्खपणा केला, त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. निवडणुकीत मंगळसूत्र भाजपचे घातले आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांचा हात धरून गेला. आता आम्हाला २०२४ पर्यंत वेळ आहे’, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांना लगावला.
केंद्रीय मंत्री राणे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमवेत जलमंदिर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी मंत्री भागवत कराड, माजी आमदार आनंदराव पाटील आदी उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘नैतिकता असेल तर शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याबाबत मंत्री राणे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ज्यांनी स्वत: राजीनामा देऊन मूर्खपणा केला, त्यांनी सरकारने राजीनामा द्यावा, असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. निवडणुकीत मंगळसूत्र भाजपचे घातले आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांचा हात धरून गेला. त्यामुळे नैतिकता नसलेल्या माणसाने आमच्यावर बालू नये. गप्प घरातच बसावे. मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्या असे म्हणण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही’, असा घणाघात त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

मंत्री राणे म्हणाले, ‘साताऱ्यात उद्योग वाढावेत, रोजगार वाढावा तसेच लोकांचेही उत्पन्न वाढण्यासाठी उद्योजक परिषद घेण्यात आली. कारण, जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उद्योग हीच एक व्यवस्था आहे. आता साताऱ्यासाठीही आवश्यक ती मदत मी आणि मंत्री भागवत कराड हे करणार आहोत. कारण, पश्चिम महाराष्ट्रातील हा भाग प्रगत समजला जातो. पण, दरडोई उत्पन्नात तसा दिसत नाही. येथील राजकारण हे उद्योगांकडे वळावे असे वाटते.’

‘तसे’ आम्ही करणार नाही
सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय? यावर मंत्री राणे यांनी, ‘निकाल आला. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचे सरकार सत्तेवर आहे. सर्वत्र आबादीआबाद आहे. विकासकामे सुरू आहेत’, असे हसत-हसत सांगितले. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारने नैतिकता असेल तर राजीनामा देऊन निवडणूक घ्यावी, असे आव्हान दिल्याचा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर मंत्री राणे यांनी, ‘त्यांना घरी बसवले आहे. त्यांनी तेथेच आराम करावा व मातोश्री चांगली ठेवावी. ते मुख्यमंत्री नावालाच होते’.

२ तासच मंत्रालयात गेले.
मातोश्री कधी सोडली नाही. राजीनामा देऊन मूर्खपणा केला. तसे आम्ही करणार नाही.

२०२४ ची निवडणूक जवळच आली आहे. त्यावेळी काय ते बघूया. दुसऱ्यांचा हात धरून ते गेले तेव्हा त्यांच्याकडे नैतिकता किती आहे, हे दिसून आले आहे, असा टोमणाही मारला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांनी राजकारणात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा मंत्री राणे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. त्यांचे कोणतेच भाकीत खरे ठरत नाही. सरकार पडणार, आमदार अपात्र ठरणार म्हणाले, पण काय झाले. वेडसर माणूस आहे, त्यांनीच शिवसेना संपवली, असे राऊतांवर वाकबाण सोडले. तर त्यांच्याकडे ५६ आमदार होते. आता संख्या १२ वर आली आहे.

मुख्यमंत्री नावालाच…
विधानसभा अध्यक्षांनी महिन्यात अपात्र आमदारांबद्दल निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही न्यायालयात जाऊ असे ठाकरे गटाने म्हटल्याचा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर राणे यांनी त्यांना कायदे माहीत नाहीत. घर कधी सोडले नाही. अध्यक्षाला कालमर्यादा कधी असते का? त्याचा अभ्यास करावा, असा टोमणेवजा सल्ला ठाकरे यांना दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -