मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा? यावरून वाद सुरू आहे. (Supreme Court) आता दोन्ही गटांकडून पक्षावर हक्क सांगितला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे-शिंदे या दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्यासाठी आणखी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज २९ नोव्हेंबर रोजी यावर सुनावणी होणार होती; परंतु न्यायाधीश कृष्णमुरारी सुट्टीवर असल्याने सुनावणी पन्हा लांबणीवर पडली आहे.
दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाने पक्षावर हक्क सांगितला. दोन्ही गटाने पक्षचिन्हावरही दावा केला होता. यात निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. शिंदे आणि ठाकरे गटातील वादाला २० जूनपासून सुरुवात झाली. विधान परिषद निवडणुकीच्या रात्रीच एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतला गेले.
त्यानंतर आणखी काही आमदार शिंदेंना जाऊन मिळाले. दोन आमदार तिथून निसटले पण त्यानंतर गुवाहाटीला काही आमदार, मंत्री जाऊन मिळाले. असे शिवसेनेचे आणि मित्र पक्ष, अपक्ष मिळून शिंदेंनी ५० आमदार आपल्या बाजूने केले. यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. यानंतर राज्यात सत्तांतराचा खेळ सुरू झाला. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला होता.