Sunday, May 19, 2024
Homeदेशकाहींना ठराविक घटनांमध्येच मानवाधिकाराचे उल्लंघन दिसते

काहींना ठराविक घटनांमध्येच मानवाधिकाराचे उल्लंघन दिसते

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या स्थापना दिवसानिमित्त मोदींची विरोधकांवर टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही लोकांना ठराविक घटनांमध्येच मानवाधिकाराचे उल्लंघन दिसते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना फटकारले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८व्या स्थापना दिवस कार्यक्रमात मंगळवारी मोदी यांनी मानवाधिकाराच्या उल्लंघनाविषयी स्पष्ट भूमिका मांडली. तसेच, अशा घटनांवरून आरोप किंवा टीका करणाऱ्यांवर देखील त्यांनी निशाणा साधला.

मानवाधिकाराची आपापल्या पद्धतीने व्याख्या

देशात हिंसक घटना घडल्या, की त्यावरून मानवाधिकारांचा मुद्दा चर्चेत येतो आणि आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशा घटनांवर मानवाधिकार आयोग देखील भूमिका घेत असतो.मानवाधिकारांशी संबंधित आणखी बाजू आहे. सध्याच्या काळात मानवाधिकाराची व्याख्या काही लोक आपापल्या पद्धतीने करू लागले आहेत. एक प्रकारच्या घटनेत काही लोकांना मानवाधिकाराचं उल्लंघन दिसते. पण तशाच दुसऱ्या घटनेत याच लोकांना मानवाधिकाराचं उल्लंघन दिसत नाही. या प्रकारची मानसिकता देखील मानवाधिकारासाठी धोकादायक आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

राजकीय दृष्टीने पाहिल्यास मानवाधिकारांचे उल्लंघन

मानवाधिकाराचेउल्लंघन तेव्हा होते, जेव्हा त्याला राजकीय दृष्टीने पाहिलं जातं. राजकीय चष्म्यातून पाहिले जाते. राजकीय फायदा-तोट्याच्या दृष्टीने पाहिले जाते. अशा प्रकारचे वर्तन लोकशाहीसाठी नुकसानकारक आहे. असेच सोयीनुसार वर्तन ठेवणारे लोक मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या नावावर देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून देशाला सावध राहायला हवे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वाचा दाखला

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाचा देखील दाखला दिला. महात्मा गांधींनी देशाला अहिंसेच्या तत्वावर आधारलेल्या चळवळीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे जगभरातले लोक बापूंकडे मानवाधिकार आणि मानवी मूल्यांचे प्रतीक म्हणून पाहतात, असे मोदी म्हणाले.

मानवाधिकार या मूलभूत तत्वासाठी देखील काम करत राहणार

याआधी अनेकदा इतिहासात जेव्हा जग चुकीच्या दिशेने भरकटलं असताना देखील भारत मात्र मानवाधिकाराच्या मार्गाशी बांधील राहिला आहे. भारत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या तत्त्वाला अनुसरून पुढे जात राहणार आहे. या मार्गात सर्वांसाठी मानवाधिकार या मूलभूत तत्वासाठी देखील भारत काम करत राहणार आहे, असेही मोदींनी यावेळी नमूद केले.

वीजटंचाईबाबत पंतप्रधान घेणार आढावा

देशात कोळशाच्या संभाव्य टंचाईची चर्चा आहे. वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आगामी काळात देशाच्या अनेक भागांमघ्ये वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोळसा उत्पादन, पुरवठा आणि वीजनिर्मिती या सर्व बाबींचा आढावा घेणार आहेत.यासंदर्भात सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोळसा आणि वीज उत्पादन, वितरणाशी संबंधित मंत्र्यांची बैठक घेऊन त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर अमित शाह यांनी देशात कोणत्याही प्रकारची कोळसा टंचाई नसल्याचा दावा केला आहे. मात्र, काही राज्यांनी याआधीच कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीजटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.

अमित शहा यांच्यामुळेच जम्मू -काश्मीरमध्ये नवे युग

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नवीन युग आणले, असे वक्तव्य देशाच्या मानवाधिकार संस्थेचे प्रमुख अरुण मिश्रा यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संबोधित केलेल्या कार्यक्रमात मिश्रा यांनी वरील उद्गार काढले. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) २८व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या न्यायमूर्ती मिश्रा यांनी, जम्मू -काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याबद्दल आणि राज्यंना दोन केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिल्याबद्दल मिश्रा यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणाच्या तरी सांगण्यावरून भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करणं हे आदर्शवादाचं प्रतीक झालंय, अशी टीकाही त्यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -